Aurangabad | अखेर औरंगाबाद महापालिकेचा प्रभागरचना नकाशा जाहीर, वॉर्ड रचना पाहण्यासाठी इच्छुकांची गर्दी 

| Updated on: Jun 02, 2022 | 3:07 PM

महापालिकेच्या एकूण 42 प्रभागांत तीन-तीन वॉर्ड अशी रचना करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेत 126 वॉर्ड तर 42 प्रभाग करण्यात आले आहेत.

Aurangabad | अखेर औरंगाबाद महापालिकेचा प्रभागरचना नकाशा जाहीर, वॉर्ड रचना पाहण्यासाठी इच्छुकांची गर्दी 
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेचा (Aurangabad municipal corporation) प्रभाग रचनेचा नकाशा आज 02 जून रोजी महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्याचा नकाशा (Map) महापालिकेबाहेर लावण्यात आला आहे. प्रभाग रचनेचा नकाशा जाहीर झाल्यानंतर आराखडा (ward structure) पाहण्यासाठी आतूर झालेल्यांची गर्दी जमा झाली. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी महापालिकेबाहेर आज गर्दी केली होती. एका भल्या मोठ्या होर्डिंगवर महापालिकेने हा नकाशा लावला असून विविध नागरिक उत्सुकतेने हा नकाशा पाहात आहेत. आता या नकाशातील आराखड्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.

नकाशा जाहीर, आता पुढे काय?

  • 02 जून रोजी औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे.
  •  16 जूनपर्यंत या प्रारुप आराखड्यावरील सूचना व हरकती मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
  • 17 जूनरोजी यासंदर्भातील सुनावणी घेण्यात येईल.
  • 24 जून रोजी निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना आराखडा हरकतींसह सादर करण्यात येणार आहे.
  • औरंगाबाद महापालिकेचा अंतिम प्रभाग रचना आराखडा 30 जूनला जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तीन सदस्यीय प्रभाग रचना

यंदा प्रथमच औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत आहे. त्यानुसार, महापालिकेच्या एकूण 42 प्रभागांत तीन-तीन वॉर्ड अशी रचना करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेत 126 वॉर्ड तर 42 प्रभाग करण्यात आले आहेत. 12 लाख 28 हजार 32 मतदारांसाठी प्रभागरचना नकाशा जाहीर करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मुदतीपूर्वी आराखडा फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग रचनेचा गोपनीय आराखडा मुदतीपूर्वीच फोडून व्हायरल केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मनपातील कंत्राटी संगणक चालक काझी इम्तियाज सोहेल काझी फवाद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. बुधवारी त्याला 03 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुरुवातीला प्रभाग रचनेचा आराखडा फुटलाच नाही, असा दावा मनपाने केला होता. मात्र नंतर मनपा प्रशासनानेच काझीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. 27 मे रोजी मनपाने हा आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर 28 मे रोजी तो व्हायरल झाला. चौकशीदरम्यान, काझी याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलीस याप्रकरणी जबाबदार असलेल्यांचा तपास करत आहेत.