Special Report : झारखंडचा अभिजीत दीपके… कोण आहेत देवेंद्र नाथ महतो? ज्यांनी झारखंडच्या सरकारला झुकवलं?
JPSC परिक्षेतील गैरव्यवहाराविरोधात देवेंद्र नाथ महतो यांनी झारखंडमध्ये मोठे विद्यार्थी आंदोलन उभे केले. त्यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने सरकारला झुकवले आणि वादग्रस्त परीक्षा रद्द करण्यास भाग पाडले. अभिजित दीपके यांच्या दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच, महतो यांनी विद्यार्थीहितासाठी संघर्ष करत झारखंडमधील विद्यार्थी चळवळीचा चेहरा बनले.

केदार भोपे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : झारखंडमध्ये JPSC परिक्षेतील गैरव्यवहाराच्या विरोधात नुकतंच विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन पार पडलं. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाशी या आंदोलनाची तुलना करण्यात येतेय.. दिल्लीत ज्याप्रमाणे अभिजीत दीपकेंच्या नेतृत्त्वाखालील आंदोलकांनी सरकारला झुकवलं त्याप्रमाणेच झारखंडमध्ये देवेंद्र नाथ महतो या विद्यार्थी नेत्याने सरकारला झुकवलं. चला तर जाणून घेऊयात झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेल्या देवेंद्रनाथ महतो यांच्याविषयी.
सुरुवातीचा काळ
33 वर्षीय महतो यांचा सुरुवातीचा काळ रांची शहराजवळील राहे गावात गेला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात महतो यांचा जन्म झाला. महतो यांच्याकडे BA, B.Ed या पदव्या असून, त्यांनी रांचीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यापीठातून MAचं पदव्यूत्तर शिक्षणही घेतलं आहे.
आंदोलनांची सुरुवात
शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य विद्यार्थी ते झारखंडच्या विद्यार्थी चळवळीचा प्रमुख चेहरा बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय राहिलाय. महतो यांच्या विद्यार्थी चळवळीतील सक्रीय सहभागीची सुरुवात रांचीमध्ये पदवीचे शिक्षण घेताना झाली. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर महतो यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. हा काळ होता तो 2014 चा. केंद्रात प्रचंड बहुमताचं मोदी सरकार सत्तेत आलं होतं. अशा कालखंडात महतो यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना एकत्र करण्यास सुरुवात केली. ‘झारखंड स्टेट स्टुडंट्स युनियन’ (JSSU) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहातील समस्या आणि विद्यापीठातील असुविधांच्या विरोधात लढा उभारला. विद्यापीठात शिक्षण घेत असतांना त्यांचा विद्यार्थ्यांमधील संपर्क अधिकच मजबूत झाला.
रस्त्यावरील आंदोलनातून मिळाली खरी ओळख
2021 सालापासून महतो यांना खरी राज्यस्तरीय ओळख मिळण्यास सुरुवात झाली. 2021 साली झारखंड सरकारने राज्यात नोकऱ्यांमध्ये 60-40चे धोरण आणले. म्हणजे नोकऱ्यांमधील 60 टक्के जागा राज्यातील तर 40 टक्के नोकऱ्या परराज्यातील उमेदवारांना देण्याचा प्रस्ताव होता.. या अन्यायाविरोधात महतो यांनी आंदोलन पुकारले. संपूर्ण राज्यभरात आंदोलन सुरु झाले. महतो यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.. रांचीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्यापासून ते ‘झारखंड बंद’ची हाक देण्यापर्यंत आंदोलनाची धग पोहोचली. यावेळी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला, अनेक गुन्हेही दाखल झाले पण ते मागे हटले नाही. या आंदोलनाने खऱ्या अर्थी महतो यांना विद्यार्थांचा नेता बनवले.
राजकारणात नशीब आजमावलं
विद्यार्थ्यांचे प्रश्न फक्त रस्त्यावर उतरुन सोडवता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर महतो यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रांची मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली ज्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. 2024च्या झारखंड विधानसभा निवडणुकीवेळी देवेंद्रनाथ महतो यांनी झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा या टायगर जयराम महतो यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांना पक्षाकडून सिल्ली या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ज्यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना तब्बल 44 हजार मतदान झाले होते.
परीक्षेतील गैरव्यवहार, उपोषण आणि सरकार झुकलं
यंदाच्या जुलै महिन्यात झारखंडमध्ये JPSC परिक्षेतील गैरव्यवहार उघडकीस आला. विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना तर होतीच पण तीव्र संतापही होता. आणि विद्यार्थ्यांच्या या संतापाला वाट मोकळी करुन दिली ती देवेंद्रनाथ महतो यांनी. नुकतेच अभिजीत दीपके यांचे दिल्लीतील आंदोलन संपले होते. दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच महतो यांनी झारखंडची राजधानी रांचीमध्ये उपोषणाला सुरुवात केली. राज्यातील हजारो विद्यार्थी रांचीत दाखल झाले. उपोषणाला बसलेल्या महतो यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती, पण अशाही परिस्थितीत त्यांनी माघार घेतली नाही. सरकार मागण्या मान्य करत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप होता.
विद्यार्थ्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला. मागण्या मान्य न झाल्याने विद्यार्थ्यांनी थेट विधानसभेवरच मोर्चा वळवला. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी झारखंडच्या विधानसभेसमोर जमले. गेट तोडून विधानसभेत जाण्याचा प्रयत्न झाला. आक्रमक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांवर पाण्याचा माराही केला. महतो यांना पोलिसांनी उचलून नेत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मारहाणही झाली पण विद्यार्थी हटले नाहीत. विद्यार्थ्यांच्या दबावापुढे सरकारला झुकावंच लागलं. अखेर 18 ऑगस्ट रोजी हेमंत सोरेन सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत वादग्रस्त ठरलेली परिक्षा रद्द केली. हा खऱ्या अर्थाने महतो यांचा विजय होता.
देवेंद्रनाथ महतो यांच्याविषयी अभिजीत दीपके काय म्हणाले?
जंतरमंतरप्रमाणे झारखंडमधील आंदोलनाला भेट देण्यासाठी तुम्ही स्वत: का जात नाहीत असा सवाल पत्रकारांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना विचारला होता. त्यावेळी दीपकेंनी दिलेलं उत्तरच सर्वकाही सांगून जातं. ‘महतो हे झारखंडमधील आंदोलनाचे स्थानिक नेते आहेत. मी तेथे जाऊन त्यांचं आंदोलन हायजॅक करु इच्छित नाही. आमच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या आंदोलनात आहेत. आमचा पक्ष नेहमीच त्यांच्यासोबत राहील.’, असं दीपके म्हणाले होते.
