औरंगाबाद : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. ते शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने औरंगाबादला गेले आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत एक अतिशय अनपेक्षित घटना घडली. आदित्य ठाकरे यांच्या सभेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. अखेर आदित्य ठाकरे यांच्या आवाहनानंतर जमाव शांत झाला. पण या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केलाय. आदित्य ठाकरे यांच्या सभेवेळी एक मोठा दगड आला होता. तसेच सभेवरुन निघताना काही दगड गाडीवर आले होते, असा धक्कादायक दावा अंबादास दानवे यांनी केलाय. त्यामुळे या घटनेवर आता पोलीस काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आदित्य ठाकरे यांनी सभेदरम्यान गोंधळ होताच जमावाला तातडीने शांत होण्याचं आवाहन केलं. “बाहेर मला वाटतं भीमशक्तीची मिरवणूक सुरु आहे. त्यांचीदेखील मिरवणूक होऊ द्या, अशी मी विनंती करतो. म्युझिक चालत असेल तर चालूद्या”, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.
“एक गोष्ट आहे, शिवशक्ती आणि भीमशक्तीत वाद नको. आपण एकत्र आलो आहोत आणि देशासाठी एकत्र आलो आहोत”, असं आदित्य ठाकरे यावेळी जमावाला उद्देशून म्हणतात.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केलाय. आदित्य ठाकरेंची सभा सुरु असताना एक दगड आला. सभेवरुन निघताना काही दगड गाडीवर आले, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
काही जण रमेश बोरणारे जिंदाबादच्या घोषणा देत होते, अशीदेखील माहिती अंबादास दानवे यांनी दिली. काही समाजकंटकांनी मुद्दामून गर्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असादेखील दावा त्यांनी केला.