औरंगाबाद: इंडिगोची विमाने (Indigo Flight) आतापर्यंत शहरातून सकाळच्या सत्रात उड्डाण घेत होती. मात्र 31 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान ही विमाने सायंकाळच्या सत्रात उड्डाणे घेतील, असे विमानतळ प्रशासनाकडून (Aurangabad Airport) सांगण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात हिवाळ्यात सकाळच्या वेळी शहरात धुक्याचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे या धुक्याचा अंदाज घेऊन 30 नोव्हेंबरनंतरचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही विमान प्राधिकरणाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
पर्यटनाचे प्रमाण वाढवणे आणि उद्योगाच्या दृष्टीने विमानसेवा अधिकाधिक सुरळीत असणे गरजेचे आहे. आतापर्यंत दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या विमानाची वेळ सायंकाळी 7 वाजता करण्यात आली आहे. या विमानाची आसन क्षमता 180 प्रवाशांची आहे, तर हैदराबादला सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी जाणारे विमान आता सायंकाळी 5 वाजता उड्डाण घेईल. याची प्रवासी क्षमता 78 आहे. दिल्लीसाठी मोठे विमान देण्यात आले आहे, ज्यामध्ये 232 प्रवासी बसू शकतील. हे विमान सध्या दुपारी अडीच वाजता उड्डाण घेत होते, ते आता सायंकाळी 7.30 वाजता जाईल, अशी माहिती इंडिगो कंपनीच्या वतीने देण्यात आली.
हिवाळ्यात धुक्यामुळे उड्डाणात अडचणी येतात. त्यामुळे वेळेत बदल करण्यात आला. महिनाभरातील परिस्थिती पाहिल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीतील वेळा ठरवल्या जातील. प्रवाशांच्या सुविधेसाठी हा बदल सकारात्मक आहे, असे औरंगाबाद पर्यटन विकास फोरमच्या सिव्हिल एव्हिएशन समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी म्हणाले.
कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील मेल्ट्रॉन रुग्णालयात सोमवारपासून लसीकरण केंद्र सुरु केल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. शहरात कोरोना लसीकरण मोहीम सुरु असली तरी काही वसाहतींमध्ये नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य विभागाकडून कवच कुंडल मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 29 हजार 800 नागरिकांचे 8 दिवसात लसीकरण झाले. नवरात्रोत्सवामुळे नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचे टाळले होते. परंतु आता पुन्हा लसीकरणाने वेग घेतला आहे. महापालिकेने 71 लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. ज्या भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळाला नाही, त्या भागात जनजागृती करून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्याहित केले जात आहे. मेल्ट्रॉन कोविड सेंटरमद्ये सुमारे 9 हजार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले.
इतर बातम्या-
औरंगाबाद: व्यावसायिक मीटरची किंमत 1 लाख रुपये? लवकरच अवैध कनेक्शनची तपासणी होणार