Manoj Jarange : खिचडी, बुंदी, भाकरी आणि… अंतरवलीत मराठा बांधवांसाठी खास मेन्यू; 16 दिवसापासून…
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईला निर्णायक कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आरपारची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले. अंतरवली सराटी येथे मराठा बांधवांची बैठक घेऊन त्यांनी मुंबईला येण्याचे आवाहन केले. मुंबईच्या मोर्चासाठी आता पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही शेवटची आणि आरपारची लढाई असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी जरांगे यांनी मुंबईला कसं पोहोचायचं याचा मार्गही सांगितला आहे. तसेच प्रत्येकाने मुंबईला यायचं आहे. कामधंदा सोडून मुंबईला यायचं आहे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. अंतरवलीत मराठा बांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जरांगे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीला शेकडो समाज बांधव उपस्थित आहेत. या सर्वांसाठी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काल दुपारी बैठकची घोषणा केल्यानंतर रात्रीपासूनच शेकडो मराठा बांधव अंतरवलीत आले. आज पहाटेपासून तर अंतरवलीत प्रचंड गर्दी झाली आहे. वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव आल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 16 दिवसांपासून अंतरवलीत अन्नछत्र सुरू आहे. आजही या अन्नछत्रात मराठा बांधवांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
खायला कमी नाही, पोटभर…
अंतरवलीत आलेल्या मराठा बांधवांसाठी आज खिचडी, बुंदी, भाकरी ठेचा आणि बेसनाचा बेत ठेवण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचीही मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. खायला काही कमी नाही. सगळं पोटभर आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या मराठा समाज बांधवांनी उपोषण स्थळी अन्नछत्र उभे केले आहे.
पोलीस अलर्ट मोडवर
मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.विक्रम साळी यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. वडीगोद्री चौकात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. सुरक्षा व्यवस्थेसह इतर बाबींचा पोलिसांनी सकाळीच आढावा घेतला. वडीगोद्री चौकात पोलिसांनी बॅरिकेटिंग केलं आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.
वडीगोद्रीमधून अंतरवलीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जरांगे यांच्या राज्यव्यापी बैठकीसाठी आलेल्या वाहनांची संख्या वाढल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. जरांगे यांनी देखील समाज बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
गावागावातून या…
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी गावागावातून, शहरा शहरातून मुंबईला येण्याचं आवाहन केलं आहे. शेतीची कामे बंद ठेवा. नोकऱ्यांना दांडी मारा, ही आरपारची लढाई आहे. तुम्हाला मुंबईला यावंच लागेल. नंतर वेळ निघून गेल्यावर बोलू नका. वेळेवर संधीचं सोनं करायला शिका. हीच वेळ आहे. हा मराठ्यांचा शेवटचा पराक्रम आहे. त्यामुळे सर्वांनी ताकदीने एकत्र या. ज्यांना शक्य नाही, त्यांनी आशीर्वाद द्यायला या, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.