दोन-चार लोकांना रिटायर केल्यानंतरच रिटायर व्हायचं; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान
पंकजा मुंडे यांनी निवृत्तीच्या चर्चा फेटाळत आपण खंबीर असल्याचे सांगितले. "दोन-चार लोकांना रिटायर केल्यावरच रिटायर होणार," असे मोठे विधान करत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले. भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असा इशारा देत त्यांनी तरुणांना शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.

मी रिटायर होणार असल्याची कुणी तरी बातमी दिली. मी काही रिटायर होत नाही. मी चांगली खमकी आहे. मला काय झालंय? रिटायर का व्हायचंय? दोन चार लोकांना रिटायर केल्यावर आपण रिटायर व्हायचं. आधी नाही व्हायचंय, असं मोठं विधान राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर आता कोण? अशी चर्चा आता या निमित्ताने सुरू झाली आहे.
बीडमधील एका कार्यक्रमात बातम्यांचा संदर्भ देऊन पंकजा मुंडे यांनी आपण रिटायर होणार नसल्याचं जाहीर केलं. मला 47 वर्ष पूर्ण झाले. अजून माझ्यात दम आहे. तोपर्यंत काम करायचं. पण कधी कधी कष्ट खूप पडतात. आपल्याला लोकांची सेवा करण्यात कमी पडू नये ही भावना असते. मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले. पण देवाने सुखाने खाऊ दिलं नाही. मुंडे साहेब पाच वर्ष जगले असते तर तुमच्यासाठीच जगले असते. हा मला विश्वास आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आशीर्वाद असू द्या
आम्ही पण तुमच्यासाठीच जगतोय. तुमच्यासाठीच काम करतोय. जिथे आहे तिथून शरीराने भेट नाही झाली तरी हृदयाचं नातं तोडू नका. एवढा मोठा संसार आहे. मोडणारे असंख्य आहेत. हा संसार मोडू नका. हा संसार पूर्ण चालू ठेवण्यासाठी आपल्या भविष्यासाठी, जिल्ह्याच्या भविष्यासाठी.. शेतकऱ्यांसाठी.. बहुजन समाजासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपल्यावर सोपवते. आपला प्रेमाचा आशीर्वाद कायम असुद्या, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
बोगसगिरी खपवून घेणार नाही
पंकजा मुंडे यांनी बोगस रस्ते आणि सभागृहांची बिले उचलणाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला. माझ्या खात्यामार्फत प्रत्येक गावामध्ये नवीन उद्योजक तयार करायचे असून त्यासाठी 50 टक्क्यांपर्यंत मोठी सबसिडी उपलब्ध आहे. जर तरुणांनी उद्योगात 1 कोटी रुपये गुंतवले तर सरकारकडून 50 लाखांची सबसिडी मिळेल. पण भ्रष्टाचाराला थारा नसेल. सिग्नल तोडणे, चोऱ्या करणे किंवा धाब्यावर दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी मी राजकारणात नाही. नियमाने चालणारा नेताच लोकांचे जीवन घडवू शकतो. त्यामुळे तरुणांनी चुकीचे मार्ग सोडून कायदेशीर प्रगती करावी. तरुणांनी गुन्हेगारी किंवा गैरवर्तनात वेळ न घालवता शासकीय योजनांचा लाभ घेऊन लखपती आणि स्वावलंबी उद्योजक व्हावे, असं त्या म्हणाल्या.