Shivsena MIM Video : ‘एमआयएम’च्या प्रस्तावानं शिवसेनेची गोची? जलील म्हणतात, मग मी अस्पृश्य का? दानवे म्हणतात, मुस्लिमांचा द्वेष नाही!

'एमआयएम' खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील पक्षामध्ये तर मतमतांतरे आहेतच. सोबतच भाजपला शिवसेनेवर पुन्हा एकदा हिंदुत्वावरून हल्ला करायची आयती संधी चालून आलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात ही आघाडीची न शिजलेली दाळ राजकारणात बरीच काळ चर्चेत राहणार हे नक्की. या साऱ्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने ने ‘एमआयएम’ खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊ हे दिग्गज काय म्हणतात ते...

Shivsena MIM Video : एमआयएमच्या प्रस्तावानं शिवसेनेची गोची? जलील म्हणतात, मग मी अस्पृश्य का? दानवे म्हणतात, मुस्लिमांचा द्वेष नाही!
अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील.
Reporter Datta Kanwate | Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Mar 20, 2022 | 1:08 PM

औरंगाबादः आपल्या साखरपेरणी बोलातून पुढच्याला मंत्रमुग्ध करणारे आणि बोलताना स्वतः विचलित न होता समोरच्याला अस्वस्थ करणारे ‘एमआयएम’ (MIM ) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी शिवसेनेची (Shivsena) गोची केलीय. त्यांनी असा एक प्रस्ताव दिला की, थेट महाविकास आघाडीलाच खिंडीत गाठले. त्यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वादंगाचा धुरळा उठलाय. जलील यांनी आज औरंगाबादमध्ये बोलताना आम्ही अस्पृष्य का, असा थेट सवाल शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना केला. तेव्हा दानवे यांनी हा धोरणात्मक आणि विचारसरणीचा प्रश्न आहे. आम्हाला मुस्लिमांचा द्वेष नाही, असे म्हणत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही असो. जलील यांच्या प्रस्तावाने महाविकास आघाडीतील पक्षामध्ये तर मतमतांतरे आहेतच. सोबतच भाजपला शिवसेनेवर पुन्हा एकदा हिंदुत्वावरून हल्ला करायची आयती संधी चालून आलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात ही आघाडीची न शिजलेली दाळ राजकारणात बरीच काळ चर्चेत राहणार हे नक्की.

नेमके प्रकरण काय?

राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची घेतलेली भेट चांगलीच गाजतेय. या भेटीत उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप टोपे यांनी ‘एमआयएम’वर केला. हा आरोप खोडून काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे आवाहन खासदार जलील यांनी केले. तसेच ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय…’ असा खोचक सल्लाही दिला. शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे वक्त्यव्य राजेश टोपे यांनी केले. तर छगन भुजबळांनी थेट जलील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच येण्याचे आवाहन केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने ‘एमआयएम’ खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊ हे दिग्गज काय म्हणतात ते…

शिवसेना मुस्लिम द्वेष्टी नाही…

शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, मंत्रिमंडळात शिवसेनेचे औरंगाबाद येथील मुस्लिम नेते अब्दुल सत्तार आहेत. यापूर्वी अंबरनाथचे शिवसेना नेते साबीर शेख सुद्धा शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना मुस्लिमांचा द्वेष करत नाही. जातीयवादी मुस्लिमांचा शिवसेना द्वेष करते. शिवसेना सरसकट सर्व मुस्लिमांचा द्वेष करत नाही. या देशाला, या भारतभूमीला जे प्रामाणिक आहेत. बाकी पक्ष, धर्म हे वेगवेगळे विषय आहेत. शिवसेनेची आणि शिवसेनाप्रमुखांची भूमिका ही मुस्लिमांच्या विरोधाची नाही आहे.

सत्तार चालतात मग जलील का नाही?

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, आम्हालाही माहित आहे की, आज शिवसेना बदलेली आहे. मी हे मान्य करतो, पण अंबादास भाऊ दोन उदाहरणे तुम्हाला देतो. तुमचा इतिहास त्यात आहे. शिवसेना कधी जन्माला आली. त्या जन्मापासून आजपर्यंत किती लोकांचे नाव त्यांनी घेतले. तर साबीरभाई. अरे तीस वर्षांपूर्वी तुम्ही साबीरभाईंना तिकीट दिले आणि पुढची पन्नास वर्षे तुम्ही तेच सांगायचे, आम्ही साबीरभाईंना एकदा दिले होते आणि आता अब्दुल सत्तार. त्यांना मला हे विचारायचे आहे की, तुम्हाला अब्दुल सत्तार चालतात. मग इम्तियाज जलील का चालत नाहीत. त्यांना हात का लावावा वाटत नाही. ते अस्पृष्य का आहेत? माझ्या आणि सत्तारांमध्ये असा फरक काय आहे. सत्तारांच्या बाबतीत तुमच्याही सामना अनेक वर्षांपासून जे लिहून आले होते. आठ कॉलमचे बॅनर होते, सत्तारांच्या बाबतीत. आणि त्यांचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे सत्तारांबाबत काय बोलले या सगळ्यावरून लक्ष हटवून आता सत्तार खूप स्वच्छ झालेला आहे. आम्ही त्याला स्वीकारतो आहे, ही जी दुटप्पीपणाची भूमिका आहे ना त्याचा मला विरोध आहे.

आपला वाद वैचारिक…

आमदार अंबादास दानवे म्हणाले की, आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध असायचे कारण नाही. मग ते इम्तियाज जलील असोत की, अब्दुल सत्तार. हा आपला वैचारिक वाद आहे. संघटनेचे जे धोरण आहे त्याविषयी मी चर्चा करतो. त्यांच्या या धोरणाला, विचारसरणीला शिवसेनेचा विरोध आहे.

आमच्यावर बी टीमचा आरोप का?

खासदास इम्तियाज जलील म्हणाले की, मला चांगले वाटले की, सत्तार भाईंची विचारसरणी खूप चांगली आहे. परिस्थितीप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल. मी त्यांच्या पक्षाबद्दल जास्त बोलू शकत नाही. पण एक वेळ आलेली आहे. मला हेच सांगायचे आहे अंबादास दानवे साहेबांना की आज या देशामध्ये सर्वात घातक कोणता पक्ष असेल, तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि आपण जी उत्तर प्रदेशमध्ये जी चूक केली आहे ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून मी प्रस्ताव दिला आहे. तुम्ही आमच्या वारंवार बोलता की ही भाजपची बी टीम आहे. पराभव झाला की एमआयएममुळे म्हणतात. भारतीय जनता पक्ष जिकंला की, एमआयएममुळे जिंकला म्हणतात. हे कधीपर्यंत चालणार? त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव दिला. त्यानंतर हे काँग्रेसवाले म्हणतात की तुम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचे सिद्ध करा. तुम्ही शिवसेनेसोबत जाताना हे धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र घेतले होते का? मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसवालेही हेच बोलत आहेत. म्हणजे हे कोण. तुम्हाला पटत असेल, तर प्रस्ताव स्वीकारा. नाही तर रामराम करा. आमचे एकला चलो रे आहेच.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow Us