औरंगाबाद: व्यावसायिक मीटरची किंमत 1 लाख रुपये? लवकरच अवैध कनेक्शनची तपासणी होणार

| Updated on: Oct 17, 2021 | 11:29 AM

औरंगाबाद: शहरातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सर्व व्यावसायिक नळांना स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad Municipal corporation) योजनेत शहरातील जवळपास 5 हजार व्यावसायिक नळांना अल्ट्रासोनिक स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. व्यावसायिक नळासाठी मोठ्या आकाराचे कनेक्शन लागते, त्यासाठी एका मीटरची किंमत एक लाखापेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 13 कोटी रुपयांची तरतूद […]

औरंगाबाद: व्यावसायिक मीटरची किंमत 1 लाख रुपये? लवकरच अवैध कनेक्शनची तपासणी होणार
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: शहरातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सर्व व्यावसायिक नळांना स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad Municipal corporation) योजनेत शहरातील जवळपास 5 हजार व्यावसायिक नळांना अल्ट्रासोनिक स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. व्यावसायिक नळासाठी मोठ्या आकाराचे कनेक्शन लागते, त्यासाठी एका मीटरची किंमत एक लाखापेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

13 कोटी रुपयांची तरतूद

महापालिकेत सुमारे 5 हजार व्यावसायिक नळांवर स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून यासाठी 13 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माहापालिकेच्या दप्तरी मात्र अद्याप 2 हजार 600 एवढे व्यावसायिक नळ आहेत. बेकायदा नळ शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले की, हे मीटर अत्याधुनिक अल्ट्रासॉनिक स्मार्ट मीटर असेल. यामुळे कर्मचाऱ्यांना रीडिंग घेणे सोपे जाईल. त्या भागातून फेरफटका मारला तरी रीडिंग कळेल, अशा प्रकारचे तंत्रज्ञान यात असेल. मोठ्या आकाराच्या कनेक्शनसाठी लावण्यात येणाऱ्या मीटरची किंमत लाखाच्या वर असू शकते, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

समांतर योजनेतही स्मार्ट मीटरवरून वाद

शहरातील नळांना मीटर बसवण्याचा महापालिका प्रशासनाची योजना आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. योजना पूर्ण करताना पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळांना मीटर बसवले जाणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी समांतर पाणीपुरवठा योजनेत शहरातील नळांना मीटर बसवण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी मीटरच्या किंमतीवरून मोठा वाद झाला होता.

व्यापाऱ्यांकडून मीटरची किंमत वसूल?

व्यावसायिक नळांना मोफत मीटर बसणार का असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान म्हणाले की, व्यापाऱ्यांकडून किती टप्प्यात मीटरची किंमत वसूल करायची, याचा निर्णय महापालिका प्रशासन घेईल. सध्या तरी व्यावसायिक नळांचे सर्वेक्षण करून हा आकडा किती आहे, याची माहिती मिळवली जात आहे.

नव्या लेखाधिकाऱ्यांची मनपात कोंडी

दररोज लाखो रुपयांची बिले काढण्याचे अधिकार असलेल्या नव्या लेखाधिकाऱ्यांची मनपा लेखा विभागातील काही जुन्या कर्मचाऱ्यांकडून कोंडी होत आहे. याबद्दल प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांंनी कोंडेकरी कर्मचाऱ्यांना दम दिला आहे.
राज्य शासनाकडून नियुक्त अधिकाऱ्यांना महापालिकेत सहजपणे कधीच स्वीकारले जात नाही. त्याचा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्यानंतर मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे अनुभव घेत आहेत. आठ दिवसांपूर्वी ते रुजू झाले. तेव्हापासून लेखा विभागातील काही जुन्या, राजकीय प्रभाव असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले. त्यामुळे त्यांनी थेट पांडेय यांच्याकडे लेखी तक्रार केली.
वर्षभरात किमान 130 स्थानिकांचा पवित्रा असतो. मागील काही महिन्यांपासून रिक्त पदावर लेखाधिकारी संजय पवार यांना पदोन्नती मिळाली. तेव्हा शासनाकडून मुख्य लेखाधिकारी रुजू झाल्यास तुम्हाला मूळ लेखाधिकारी या पदावर जावे लागेल, अशी अट घातली हाेती. ती पवार यांनी मान्य केली होती. नंतर मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे रुजू झाले. पण पहिल्याच दिवशी कुठल्या दालनात बसायचे यावरून मानापमान नाट्य सुरू झाले. मग एका सफाई कर्मचाऱ्याने लेखा विभागाच्या लिपिकाला शिवीगाळ केली. आता काहीजणांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार वाहुळेंनी केली आहे.

इतर बातम्या-

चांगल्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेत योग्य उमेदवार निवडून द्या, डॉ. भागवत कराड यांचे औरंगाबादेत आवाहन

Weather: औरंगाबादसह मराठवाड्यात रात्रभर पावसाची रिपरिप, पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यांसह बरसात, काय आहे हवामानाचा अंदाज?