‘यांना बापसुद्धा इतरांचा लागतो, स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल’, उद्धव ठाकरे यांचा खोचक घणाघात!

भाजपसोबत आहे कोण? शिवसेना, अकाली दल सोबत नाही. ज्यावेळेला गरज होती तेव्हा वापरुन घेतलं आणि आता लात मारत आहेत. त्यांना खाली खेचायचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

यांना बापसुद्धा इतरांचा लागतो, स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल, उद्धव ठाकरे यांचा खोचक घणाघात!
Harish Malusare | Updated on: Apr 02, 2023 | 10:15 PM

संभाजीनगर : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमधील सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपसह शिंदे यांचं नाव न घेता खोचक शब्दात निशाणा साधलाय.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज सुद्धा माझ्या हातात काही नाही. चांगले दिवस असतात त्यावेळेला कोण असतं? ज्यावेळेला भाजप अस्पृश्य होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती. Uddआज त्यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं. एवढंच नाही तर वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल, यांना बापसुद्धा इतरांचा लागतो. मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. मी भाजपला आव्हान देतो हिंमत असेल तर मोदींनी यावं आणि त्यांच्या नावाने मतं मागावी, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

आज मित्रपक्ष कठीण काळात सोबत राहीले हे विसरु नका. तुम्ही माझं काय चोरणार. मला माझ्या जगदंबेचे आशीर्वाद आहेत. तुमच्या सभेला तुम्ही माणसं भाड्याने लागतात. सभेतही वाचू का विचारतात. तुम्ही दुसऱ्याचे विचार मांडता. तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल. पण समोर बसलेली जनता तुम्हाला वाचवू शकणार नाही. जनतेशी खेळ करु नका, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेवर घणाघात केला.

नुस्ती सत्ता पाहिजे. हो दिली ना सत्ता. आम्ही तुमच्यासोबत होतो. मी शिवेसनाप्रमुखांना काय वचन दिलं होतं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन, असं वचन दिलं नव्हतं. हे मी अमित शाह यांना स्पष्ट सांगितलं होतं. आजसुद्धा तुम्ही शिवसेना फोडली. पण तरीही हृदयावर दगड ठेवून बसला आहात ना? मिंदेंचं ओझं डोक्यावर घेऊन निवडणूक लढवणार आहात का? हा फसवणुकीचा खेळ कशासाठी चालवला आहे? शिवसेना संपवण्यासाठी? पण ते तुम्हाला पेलवणार नसल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

ही आमची सभा. या सभेला वज्रमूठ असंच नाव दिलेलं नाही. तुम्ही आमचे हात घ्यायला निघालात. बाळासाहेबांनी शिवसैनिकाला मोठं करण्याची वृत्ती दिली. मोठी करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आहे. ज्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो, सोसलो, अगदी सावरकरांचे भक्त आले असते, ज्या सावरकरांनी 14 वर्ष भोगलं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलं. तेच स्वातंत्र्य धोक्यात आहे हे भाजपमधल्या सावरकर भक्तांना मान्य आहे का? आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे नाहीतर आपणच आपल्या देशात गुलाम होऊ, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us