भाज्यांनी गाठली शंभरी, औरंगाबादकर हैराण, म्हणतात आता काही दिवस डाळ अन् कडधान्येच खाणार!

| Updated on: Oct 22, 2021 | 12:38 PM

काही दिवसांपूर्वी बेभाव विकले जाणारे टोमॅटो आता 80 रुपये किलोच्या घरात जाऊन बसलेत. कोथिंबीरीने तर 40 रुपये जुडीची किंमत पटकावलीय. त्यामुळे सामान्य माणसांना एक भाजी घ्यायची म्हटली शंभरची नोट मोडावी लागतेय.

भाज्यांनी गाठली शंभरी, औरंगाबादकर हैराण, म्हणतात आता काही दिवस डाळ अन् कडधान्येच खाणार!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः मागील आठवड्यापासून औरंगाबाद शहरात भाज्यांचे भाव (Vegetable price hike) गगनाला भिडल्याचे चित्र आहे. कोणतीही भाजी 20 रुपये पाव किलो या दराच्या खाली मिळत नाही. बाजारात भाजी आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे (Aurangabad citizens) हे भाव ऐकून अक्षरशः डोळे पांढरे होत आहेत. काही दिवसांपूर्वी बेभाव विकले जाणारे टोमॅटो आता 80 रुपये किलोच्या घरात जाऊन बसलेत. कोथिंबीरीने तर 40 रुपये जुडीची किंमत पटकावलीय. त्यामुळे सामान्य माणसांना एक भाजी घ्यायची म्हटली शंभरची नोट मोडावी लागतेय. आता पुढचे काही दिवस भाज्या स्वस्त होईपर्यंत डाळी आणि कडधान्येच खावीत, असा विचार ग्राहक करतायत.

भाज्यांचे दर काय?

शेवग्याच्या शेंगा- 100 ते 200 रुपये किलो
टोमॅटो-80 ते 100 रुपये किलो
वांगे- 80 ते 100 रुपये किलो
सिमला मिरची- 90 ते 100 रुपये किलो
भेंडी- 60 ते 80 रुपये किलो
फुलकोबी- 80 ते 100 रुपये किलो
गवार- 100 ते 120 रुपये किलो
दोडके-70 ते 80 रुपये किलो
कारले- 70 ते 80 रुपये किलो
कोथिंबीर- 30 ते 40 रुपयांना एक जुडी
पालक- 20 रुपये जुडी

का कडाडले भाज्यांचे दर?

परतीच्या मुसळधार पावसाने शेतातील भाज्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक भाज्या जागेवरच खराब झाल्या. याचा परिणाम आता भाजीमंडईत पहायला मिळत आहे. जाधववाडीत भाज्यांची आवक 40 टक्के घटली आहे. भाज्यांचे व्यापारीदेखील त्रस्त आहेत.

आता पुढचे काही दिवस डाळी अन् कडधान्येच!

बाजारात भाजी आणण्यासाठी पिशवी घेऊन निघालेले अनेक नागरिक महागलेले दर ऐकून तसेच परत येत आहेत. कित्येकांनी तर मागील पंधरा दिवसांपासून घरात कोथिंबीरच आणलेली नाही. आता आम्ही भाज्यांचे दर स्वस्त होईपर्यंत केवळ डाळी आणि मूग-मटकी अशा कडधान्यांचेच प्रकार कालवण म्हणून करण्याचे ठरवले आहे, अशी प्रतिक्रिया जयश्री चाळक या गृहिणीने दिली.

आज पाणीपुरवठ्यात अडथळा

महावितरणने पैठणच्या उपविभागांतर्गत चितेगाव परिसरात वीजपुरवठ्यातील तातडीच्या तांत्रिक दुरुस्त्यांसाठी 22 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पाच तासांचा शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे. या काळात जायकवाडीतील महापालिकेच्या पंपगृहांचाही वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरासाठी होणारा पाणी उपसा पूर्णपणे बंद राहील. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून वसाहतींना नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. शटडाऊन काळात मुख्य जलवाहिनी, पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान आवश्यक असलेल्या गळत्यांची व तांत्रिक दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन पालिकेकडून केले जात आहे, अशी माहिती मनपातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.

इतर बातम्या-

काय सांगता ? एकाच वनस्पतीतून टोमॅटो अन् वांग्याचे उत्पादन, दुहेरी फायदा

दादर मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी लोकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा