नवव्यांदा योगेशसोबत पाटावर बसली अन् तेवढ्यात…; बीडमध्ये लुटेरी दुल्हनचा गेम ओव्हर, नेमकं काय घडलं?

बीडमध्ये ८ वेळा लग्न करून नवरदेवांना लुटणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाला असून, नवव्या लग्नाच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली.

नवव्यांदा योगेशसोबत पाटावर बसली अन् तेवढ्यात...; बीडमध्ये लुटेरी दुल्हनचा गेम ओव्हर, नेमकं काय घडलं?
Looteri Dulhan
| Updated on: May 06, 2026 | 11:45 AM

ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चक्क ८ वेळा लग्न करुन नवरदेवांना चुना लावणाऱ्या एका लुटेरी दुल्हनला नवव्या लग्नाच्या तयारीत असताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.

नेमकी घटना काय?

बीड जिल्ह्यातील उमापूर येथील योगेश शिंदे हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून विवाहासाठी वधूच्या शोधात होता. ग्रामीण भागात मुलींचे प्रमाण कमी असल्याने विवाह जुळण्यात अडचणी येत होत्या. याचाच फायदा घेत काही मध्यस्थ एजंटने योगेशला गाठले. त्यांनी त्याला एका मुलीचे स्थळ सुचवले. लग्नासाठी मध्यस्थांनी योगेशकडून लाखो रुपयांची मागणी केली. घरच्यांनीही मुलाचे लग्न होत असल्याच्या आनंदात ही मोठी रक्कम दिली. लग्न थाटामाटात पार पडले.

 कशी झाली फसवणूक?

लग्न होऊन काही दिवस उलटत नाही तोच नवरी मुलगी घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन गायब झाली. योगेशने तिचा आणि एजंटचा शोध सुरू केला. त्यावेळी त्याला धक्कादायक माहिती मिळाली. त्या महिलेने यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि इतर जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे आठ वेळा लग्ने केली होती. प्रत्येक वेळी काही दिवस सासरी राहून संधी मिळताच ती दागिने आणि पैसे घेऊन पोबारा करत असे. उमापूरमधील योगेश हा तिचा नववा बळी ठरला होता.

या फसवणुकीमुळे योगेश शिंदे मानसिकदृष्ट्या खचला. त्याने बीडच्या पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार दिली आहे. एजंट आणि त्या महिलेने संगनमताने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझी लाखो रुपयांची फसवणूक झाली असून समाजात माझी नाहक बदनामी झाली आहे. या धक्क्यातून मी सावरू शकत नाही. मला न्याय न मिळाल्यास माझ्यासमोर आत्महत्येवाचून पर्याय नाही, अशी तक्रार योगेशने बीडच्या पोलिसांना दिली आहे. त्यासोबतच पोलीस अधीक्षकांकडे या टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एजंटांचे जाळे आणि ग्रामीण भागाला लक्ष्य

ग्रामीण भागात सध्या मुलींचे प्रमाण कमी असल्याने अनेक तरुणांचे विवाह रखडले आहेत. ही टोळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशा तरुणांना शोधते ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही. एजंट स्वतःला मुलीचे नातेवाईक किंवा हितचिंतक भासवून मुलाकडच्यांचा विश्वास संपादन करतात. मुलीच्या गरिबीचे किंवा इतर घरगुती कारणांचे निमित्त साधून ३ ते ५ लाख रुपये उकळले जातात. लग्न लागल्यानंतर काही दिवसातच नवरी दागिने घेऊन पळून जाते आणि एजंट आपले फोन बंद करतात, अशी पद्धत सध्या सुरु आहे.

दरम्यान याप्रकरणी सध्या चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती तरुणांना लुटले आहे, याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

Follow Us