Dyaneshwari Munde : मोठी बातमी, ‘माझ्या सिंदूरला न्याय द्या’, महादेव मुंडे यांच्या पत्नीकडून विष प्राशन
Dyaneshwari Munde : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वी 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. अद्याप या प्रकरणात आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आक्रमक झालं आहे. त्यातून आजची घटना घडलीय.

महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक झालेली नाही. 18 महिन्यांपूर्वी हा खून झाला होता. त्यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, म्हणून त्यांच्या पत्नीने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करुन स्वत:ला संपवण्याच प्रयत्न केला. बेशुद्धअवस्थेत त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बॉटलमध्ये नेमकं कुठलं औषध होतं याची माहिती नाही. इमर्जन्सी वॉर्ड मध्ये उपचार सुरू. ज्ञानेश्वरी मुंडेंना अति दक्षता विभागात हलवण्याची शक्यता.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचाराला सुरुवात.परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वी परळी शहरात निर्घृण हत्या झाली होती. 18 महिन्यानंतर देखील हत्या प्रकरणातील आरोपी सापडलेले नाहीत. यासंदर्भात वेळोवेळी महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबाने पोलिसांना भेटून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
मात्र तपासामध्ये काहीच निष्पन्न होत नसल्याने आज कुटुंब आक्रमक झालं होतं आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले होते. दरम्यान पोलीस अधीक्षकांची भेट झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माझ्या सिंदूरला न्याय द्या अशा प्रकारची मागणी केली आहे.आतापर्यंत महादेव मुंडे हत्या प्रकरणात सात तपास अधिकारी बदलले. CID मार्फत चौकशी करू असं पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे.
कधी घेतलं पॉयजन?
सकाळी मुंडे कुटुंबियांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधला आणि यानंतर परत त्यांच्या गाडीत बसल्यानंतर पॉयजन घेतल्याची माहिती. त्यांना बेशुद्ध अवस्थेत बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सुरेश धस यांनी काय आरोप केलेला?
22 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. हत्येतील आरोपींना अजूनही अटक झालेली नाहीय. हत्येतील आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाच्या आवतीभवती फिरतात असा आरोपही सुरेश धस यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जानेवारीत काय मागणी केलेली?
“परळीत माझ्या नवऱ्याची पंधरा महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली, मात्र अजूनही माझ्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही, जसं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाकडून सीआयडी, एसआयटी स्थापन करण्यात आली होती, तसेच माझ्या नवऱ्याच्या खून प्रकरणातही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याच पद्धतीने सीआयडी एसआयटी स्थापन करून गुन्ह्याचा तपास तात्काळ करावा व माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा” असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं होतं.
