
अशोक काळकुटे/ प्रतिनिधी: शिंदे सेनेचे बीड उप तालुकाप्रमुख भारत देवकते यांनी बीड जवळील म्हसोबा फाटा परिसरात बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी व्हॉट्सॲपवर अगोदर स्टेटस ठेवलं, एक चिठ्ठी ही लिहिली. त्यांच्या मनात भावानांची कालवाकालव सुरू होती. त्यांनी बाभळीच्या झाडाला साडी बांधली. त्यानंतर त्यांनी सर्वांची आठवण काढली. गळफास लावला आणि स्वतःला त्यावर झोकून (Beed Bharat Devkate ) दिले. पण त्यांचं नशीब बलवत्तर होते. साडी फाटली आणि ते खाली पडले. तोपर्यंत अनेकांनी म्हसोबा फाट्याकडे धाव घेतली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू
आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी देवकते यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो ठेवला होता. “दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र!” असे लिहीत त्यांनी आपल्या मृत्यूला ढेकणमोहा गावचे सरपंच पती शिवाजी भगवान गाडीवान आणि ग्रामसेवक बी.जी.तांदळे यांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सुदैवाने साडी फाटल्याने ते खाली पडले यानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
का उचलले टोकाचे पाऊल?
भारत देवकते यांनी स्टेट्समधील चिठ्ठीत नमूद केले आहे की, “मी गावातील गायगोठा, विहीर, शेततळे यांसारखी कामे नि:शुल्क दरात करण्याचे ठरविले होते. मात्र, सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे मी माझे जीवन संपवत आहे. या दोघांना माझ्या मृत्यूसाठी दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिठ्ठीतून देवकते यांनी केली आहे. त्यांच्या या चिठ्ठीने खळबळ उडाली आहे.
तर देवकते यांनी आपल्या मित्रांना आणि शिवसैनिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, या निर्णयासाठी त्यांची पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणालाही दोषी धरू नये. तसेच त्यांनी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनाही शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.