Beed | भगरीच्या दशम्या खाल्ल्याने 70 जणांना विषबाधा, एकादशीच्या दिवशी बीडमधील वडवणी येथील घटना

| Updated on: Jul 11, 2022 | 9:34 AM

अनेक दिवसांची पॅकिंग असलेल्या भगरीत बुरशी तयार होते. ही बुरशी म्हणजे एक प्रकारचे विषच असते.

Beed | भगरीच्या दशम्या खाल्ल्याने 70 जणांना विषबाधा, एकादशीच्या दिवशी बीडमधील वडवणी येथील घटना
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडः आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) रविवारी राज्यभरातील भाविकांनी विठ्ठलाची पूजा केली. उपवास करून एकादशी साजरी केली. मात्र बीडमधल्या (Beed) एका गावात उपवासासाठी केलेल्या फराळातून अनेकांना विषबाधा (Food poisoning) झाली.  भगरीपासून तयार केलेल्या दशम्या खाल्ल्याने एकाच गावातील तब्बल 70 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे हा प्रकार घडला. आषाढी एकादशीनिमित्त गावात उपवासासाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणावर भगरीच्या दशम्याही तयार करण्यात आल्या होत्या. या दशम्या खाल्ल्यानंतर अनेक जणांना उलटी, चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे एकानंतर एक असे लोक रुग्णालय गाढू लागले. संध्याकाळ पर्यंत तब्बल 70 जणांना रुग्णालय गाठावे लागले.

काय घडली घटना?

रविवारी आषाढी एकादशीनिमित्त गावातील बहुतांश जणांना उपवास होता. त्यामुळे वडवणी तालुक्यात कवडगाव येथे गावकऱ्यांनी एकत्रितपणे भगरीच्या दशम्या केल्या होत्या.
मात्र त्या खाल्ल्यामुळे अनेकांना उलटी, चक्कर येणे आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. कवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत काही जणांवर उपयाच सुरु करण्यात आले. तर काही जणांना आरोग्य उपकेंद्र आणि काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती कवडगावचे सरपंच संदिपान खळगे यांनी दिली. फराळ केल्यानंतर उलटी, मळमळ होऊ लागल्याने नागरिकांनी तत्काळ रुग्णालयाचा रस्ता धरला. लवकर उपचार सुरु करण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

भगरीवर बुरशी तयार झाली?

भगरीच्या दशम्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्यामुळे कवडगाव येथे नागरिकांमध्ये खळबळ माजली होती. याबाबत खासगी डॉ. शंकर वाघ म्हणाले की, अनेक दिवसांची पॅकिंग असलेल्या भगरीत बुरशी तयार होते. ही बुरशी म्हणजे एक प्रकारचे विषच असते. ते पोटात गेल्याने कवडगाव येथील नागरिकांना एकाच वेळी फराळातून विषबाधा झाल्याचे दिसले. गावातील रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती हाती आली आहे.

रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना त्रास

दशमी खाल्ल्याने काहींना त्रास झाला तर काहींना झाला नाही. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती, त्यांना या प्रकाराचा त्रास झाला. तर ज्यांची प्रतिकारक शक्ती चांगली होती, त्यांना विषबाधा झाली नाही. अन्न व औषध प्रसासनाला सदर माहिती कळवण्यात आली आहे, अशी माहिती वडवणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांनी दिली.