Tomato Farmer : रडत रडत थोबाड झोडले, शेतकर्‍याचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, अवकाळीमुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल, आता वाली कोण?

Beed Tomato Farmers : अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने राज्यातील अनेक भागात शेतीचे, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकपासून कांदा उत्पादन पट्ट्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Tomato Farmer : रडत रडत थोबाड झोडले, शेतकर्‍याचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, अवकाळीमुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल, आता वाली कोण?
टोमॅटोचा लाल चिखल
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 03, 2025 | 11:48 AM

“अरे देवा, हे काय झालं रं, भाऊ, तळहातावरील फोडासारखं जपलंलं पीक वाया गेलं हो, आता इतका खर्च भरून कसा निघणार, काही सुचत नाही. इतकी मेहनत घेतली, पण सगळं वाया गेलं, आता काय करू काही सुचत नाही.” असा आर्त आक्रोश बीड जिल्ह्यातील महिला शेतकर्‍याने केला. तिच्या आक्रोशाने तुमचे काळीज पिळवटून निघाल्याशिवाय राहणार नाही. तर दुसरीकडे तरुण शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू तुमचे काळीज पिळवटल्याशिवाय राहणार नाही.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नाशिकसह इतर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे शेतकरी हवालदिल झालेले असतानाच आता नगदी पीक घेणार्‍या शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक एका झटक्यात खराब झाले आहे. अवकाळी पूर्वी ठिबक सिंचनाने जगवलेले पीक अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यावर थोबाड झोडून घेण्याची वेळ आली आहे.

अवकाळीने सर्वच हिरावले

बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील राम गोरख शेळके यांनी 80 हजार रुपये खर्च केले. मिस्तरी काम करुन एक एक रुपया गोळा करून टोमॅटोची शेती केली. सव्वा एकर मध्ये सात हजार टोमॅटोच्या झाडाची लागवड केली. एप्रिल महिन्यात ठिबकने पाणी देऊन शेती फुलवली होती. ऐन तोडणीला आलेले टोमॅटो अवकाळीने हिरावले. सर्वच शेतात पाणी साचल्याने सर्व टोमॅटोची बाग जळून गेली. आज शेतात सर्वत्र फक्त लाल चिखल झाला. टोमॅटो सडून गेले आहेत.

7-8 लाखांचा फटका

आज जवळपास सात लाख रुपये या टोमॅटो मधून राम शेळके यांना उत्पन्न झाले असते पण आज एक ही रुपया पदरात न पडता, उलट त्यांना टोमॅटोची झाडं उपटून टाकावी लागत आहेत. त्यांच्याकडे मजूरी द्यायला सुद्धा पैसे नाहीत. आता ही शेती पुन्हा कशी फुलवायची असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून आहे. माय बाप सरकारने आम्हाला मदत द्यावी. आता निर्सगाने आमची साथ सोडली,माय बाप सरकारने आम्हाला थोडीफार का होईना मदत द्यावी अशी मागणी युवक शेतकरी राम शेळके यांनी केली आहे.

त्वरीत नुकसान भरपाई द्या

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांनी याविषयीचे ट्वीट केले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ही दृश्ये आहेत. अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांची झालेली ही अवस्था अतिशय अस्वस्थ करणारी आहे. कर्जाऊ पैसे घेऊन बाग फुलवली मात्र हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळाला. दुर्दैवाने कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने प्रत्येक शेतकर्‍याची केली आहे. झालेल्या नुकसानाची सरकारने संवेदनशीलतेने दखल घ्यावी. त्वरित नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना धीर द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. अन्यथा त्यांचे भवितव्य धोक्यात येईल, असे जयंत पाटील म्हणाले.