
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी मोठी बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे, अनेक उमेदवारांनी ऐनवेळी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं अनेक पक्षांना धक्का बसला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विरोधी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार पक्षप्रवेश झाले होते. ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या लोकांना भाजपकडून महापालिकेचं तिकीट देण्यात आलं होतं, तर निष्ठावंतांना डावलण्यात आलं. त्यामुळे भाजपात देखील मोठी बंडखोरी झाली होती, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलं आहे. मात्र दुसरीकडे भाजपला धक्का बसला आहे. नांदेडमधून मोठी बातमी समोर येत आहे.
नांदेड महापालिकेसाठी भाजपनं रिपब्लिकन पार्टीसोबत युती केली होती. मात्र आता ही रिपब्लिकन पार्टीसोबतची युती तुटली आहे. रिपाईकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. रिपाईकडून भाजपकडे सात जगांची मागणी करण्यात आली होती, मात्र भाजपने आम्हाला केवळ झूलवत ठेवल्याचा आरोप रिपाईच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
विधानासभा आणि लोकसभा निवडणुकीसाठीच निळा झेंडा पाहिजे का? असा सवाल यावेळी उपास्थित करण्यात आला आहे. भाजप सोबत युती तोडल्याची घोषणा करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं यावेळी रिपाईचे महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे यांनी जाहीर केले आहे. हा भाजपसाठी नांदेडमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट काही ठिकाणी भाजपसोबत आहे तर काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत आहे. मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे, आणि राष्ट्रवादी शरद पवार गट याची आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.