Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांची नावे वगळली, त्यांना पुन्हा… सरकारच्या बड्या मंत्र्याच्या मोठ्या विधानाने दिलासा?
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही सध्या राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही लाडक्या बहिणींची नावे यादीतून वगळी गेल्यामुळे नव्या वाद सुरु झाला आहे. आता सरकारच्या बड्या मंत्र्याच्या मोठ्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चर्चेचा विषय बनली आहे. योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असला तरी, छाननी प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांचे अर्ज बाद झाल्याचे किंवा नावे यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून आपण वंचित राहू की काय, अशी चिंता अनेक महिलांना सतावत होती. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे या संदर्भात एक मोठे विधान केले आहे.
नावे वगळली म्हणजे कायमची बाद नाही!
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबतच्या अनेक प्रश्नांना स्पष्ट उत्तरे दिली. ज्या महिलांची नावे योजनेच्या यादीतून कमी झाली आहेत, त्यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “काही नावे कमी झाली आहेत, याचा अर्थ ती कायमस्वरूपी (Permanent) कमी झाली आहेत, असा अजिबात होत नाही.” बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे काही नावे तात्पुरती बाजूला ठेवली जाऊ शकतात, परंतु सरकार या प्रकरणांची पुन्हा तपासणी करेल. अर्जामध्ये किंवा प्रक्रियेत काही चूक असेल, तर ती नक्कीच दुरुस्त केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
लाडकी बहीण योजनेतील प्रमुख मुद्दे:
पुनर्तपासणी होणार: वगळण्यात आलेल्या अर्जांची सरकारकडून पुन्हा सविस्तर तपासणी केली जाणार आहे.
चुका दुरुस्त करण्याची संधी: कागदपत्रांमध्ये किंवा माहितीत त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून महिलांना पुन्हा योजनेत सामावून घेण्याची व्यवस्था सरकार करणार आहे.
अंतिम उद्देश गरिबांचे कल्याण: ही योजना केवळ समाजातील शेवटच्या आणि खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या गरीब घटकांच्या कल्याणासाठीच राबवली जात आहे, यावर त्यांनी भर दिला.
राजकीय फायद्याचे आरोप फेटाळले
शिंदे गटाचे आमदार सूर्यवंशी यांनी या योजनेच्या राजकीय फायद्याबाबत केलेल्या कथित विधानाबाबत बावनकुळे यांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना त्यांनी या योजनेमागे कोणताही राजकीय स्वार्थ नसल्याचे स्पष्ट केले. “कोण काय बोललं मला माहिती नाही, पण या योजनेमध्ये कोणताही राजकीय फायदा दडलेला नाही. एखादी योजना जेव्हा राबवली जाते, तेव्हा ती समाजातील तळागाळातील आणि शेवटच्या गरिबाच्या कल्याणासाठीच असते,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचे आणि टीकाकारांचे दावे खोडून काढले.