Bird Flu : बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू झाल्याचं दाखवा आणि बक्षिस मिळवा- सुनील केदार

| Updated on: Jan 22, 2021 | 10:55 PM

बर्ड फ्लू असेल तिथे एक किलोमीटरचा परिसर सिल करायला सांगितला आहे. या रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं सुनील केदार यांनी सांगितलं.

Bird Flu : बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू झाल्याचं दाखवा आणि बक्षिस मिळवा- सुनील केदार
sunil kedar
Follow us on

वर्धा : बर्ड फ्लू संबंधी वेगळा फार्स निर्माण झाला तो थांबवला पाहिजे. देशात बर्ड फ्लूमुळे आजवर एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्लूने एकाही माणसाचा मृत्यू झाला असेल तर तो शोधून द्या. त्याला मी रोख रक्कम बक्षिस म्हणून देईन, असं पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलंय. सध्या राज्यात बर्ड फ्लूमुळे अनेक कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत आहे. अशावेळी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुनील केदार यांनी बर्ड फ्लूसंबंधी निर्माण झालेला फार्स थांबवला पाहिजे असं म्हटलंय.(Sunil Kedar’s appeal to the people to create awareness about bird flu)

बर्ड फ्लूचा फार्स नको- केदार

वर्ध्याच्या जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सुनील केदार यांनी हे वक्तव्य केलं आहे. बर्ड फ्लू बद्दल राज्य सरकार संवेदनशिल आहे. बर्ड फ्लूमुळे सर्वात मोठं नुकसान राज्याच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचं होतं. बर्ड फ्लूचा फटका शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगार करणाऱ्या मुलांना बसतो. त्यामुळे हा मुद्दा संवेदनशिल आहे. उगाच याचा फार्स करु नका. बर्ड फ्लूमुळे माणसं मरत नाहीत. बर्ड फ्लू असेल तिथे एक किलोमीटरचा परिसर सिल करायला सांगितला आहे. या रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं सुनील केदार यांनी सांगितलं.

बर्ड फ्लूमुळे माणसं मरत नाहीत. चिकन-अंडी रोज खा. 70 हजार डिग्रीवर त्याला अर्धा तास शिजवा आणि आरामात खा. चिकन आणि अंडी खाल्ल्याने कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळेल, असं सांगत केदार यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका?

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार चिकन किंवा इतर कुक्कुटपालन उत्पादन योग्य प्रकारे शिजवल्यास ते खाण्यास सुरक्षित आहेत. यामुळे हा फ्लू पसरत नाही किंवा कोणालाही संसर्गित होत नाही. अहवालानुसार, पोल्ट्रीसंबंधित पदार्थ 70 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात शिजवले गेले पाहिजेत, जेणेकरून मांस कच्चे आणि लालसर राहणार नाही. जरी एखाद्या कोंबडीस संसर्ग झाला असेल तर, व्यवस्थित शिजवल्यामुळे H5N1 विषाणू मरेल. डब्ल्यूएचओच्या संशोधनानुसार, योग्यरित्या शिजवल्यानंतर कोणत्याही पोल्ट्री उत्पादनांमध्ये कोणताही रोग पसरत नाही. परंतु, जर पोल्ट्री उत्पादन अर्धवट शिजवलेले असेल, तर संसर्गाचा धोका वाढतो.

बर्ड फ्लूची लक्षणं काय?

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो

बर्ड फ्लूवर औषध आहे का?

बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.

संबंधित बातम्या :

Bird Flu | आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!

Birds Dying in India :कोरोनानंतर बर्ड फ्लूचं संकट?, देशभरात हजारो पक्षांचा मृत्यू, राजस्थानात हायअलर्ट

Sunil Kedar’s appeal to the people to create awareness about bird flu