NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध
NCP Merger Talk : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. काहीतरी मोठं घडणार असल्याचे हे संकेत आहेत. गुरुवारी संध्याकाळी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या पक्षाचे जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाल्याच दोन्ही बाजूच्या नेत्यांनी मान्य केलय. पण अजितदादांच्या निधनानंतर ही चर्चा मागे पडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येऊ शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जातय. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अजून बळकट व्हावी असं भाजपचं मत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं अशीच भाजपची सुद्धा इच्छा आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. सध्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्र पवार यांच्याकडे आहे. तो भाजपप्रणीत एनडीए सोबत आहे. दुसरा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीमध्ये आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं अशी दोन्ही बाजूच्या अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण एनसीपीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि त्यांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांना विलिनीकरण नकोय. सुनेत्रा पवार यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. “सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विलिनीकरणाला विरोध आहे. विलिनीकरण झाल्यास शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचं नियंत्रण जाईल म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विलिनीकरणाला विरोध आहे” असं सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितलं. पार्थ पवार हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत.
राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
गुरुवारी संध्याकाळी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या पक्षाचे जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी होते. त्यावेळी तिथे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर गुरुवारी रात्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी सुरु असल्याचे हे सर्व संकेत आहेत.
वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली, त्या बद्दल जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. जयंत पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. माझी तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत भेट झाली नाही असं त्यांनी सांगितलं.