पर्यटन, आरोग्य, कायदा सुव्यवस्थेत राज्याची पिछेहाट, ही तर ठाकरे सरकारची ‘द्विवर्षपूर्ती भेट’, भातखळकरांचा हल्लाबोल

महाराष्ट्राची आरोग्य, कायदा सुव्यस्था, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात घसरण झालीय. महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अधोगतीकडे नेत ठाकरे सरकारची राज्यातील जनतेला ही ‘द्विवर्षपूर्ती भेट’ आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केलीय.

पर्यटन, आरोग्य, कायदा सुव्यवस्थेत राज्याची पिछेहाट, ही तर ठाकरे सरकारची द्विवर्षपूर्ती भेट, भातखळकरांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 6:59 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला आज दोन पूर्ण झाली आहेत. राज्याला सर्वांगीण प्रगतीकडे नेण्याचे सोडून केवळ टक्केवारी, वसुली, खंडणी व सुडाचे राजकारण करण्यात सरकार मग्न आहे. महाराष्ट्राची आरोग्य, कायदा सुव्यस्था, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात घसरण झालीय. महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अधोगतीकडे नेत ठाकरे सरकारची राज्यातील जनतेला ही ‘द्विवर्षपूर्ती भेट’ आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केलीय.

पर्यटनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला

“इंडिया टुडे या नियतकालिकाने घोषित केलेल्या आकडेवारीत स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र 6 व्या क्रमांकावरून 10 व्या क्रमांकावर घसरला आहे. अभ्यासाच्या नावाखाली विनानिमंत्रण परदेश पर्यटन करण्यात मग्न असल्यामुळे ‘युवराज’ मंत्री असलेल्या पर्यटनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्रीच लुटेरे व वसुलीखोर असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र अकराव्या स्थानी घसरलाय,” असा दावा भातखळकर यांनी केला.

आर्थिक प्रगतीच्या बाबतीत तब्बल पंधराव्या स्थानी घसरला

तसेच “कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला मृत्युशय्येवर ठेवणाऱ्या आरोग्य मंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्र आरोग्य सुविधांच्या यादीत चौथ्या स्थानावरून तब्बल तेराव्या स्थानावर घसरला आहे. केवळ स्वत:च्या पक्षाचा व नातेवाईकांचा आर्थिक विकास करण्यात राज्याचे अर्थमंत्री व्यस्त आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सातव्या स्थानी असलेला महाराष्ट्र आर्थिक प्रगतीच्या बाबतीत तब्बल पंधराव्या स्थानी घसरला आहे. त्यामुळे विचारांच्या आघाडीवर व सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आघाडीवर हे सरकार सर्वागीण विकासाच्या बाबतीत राज्याला अपयशाच्या खायीत घेऊन चालले आहे,” असा आरोपदेखील अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.

जनताच यांच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाही

एक पूर्णपणे विश्वासघातकी, भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम सरकार म्हणजे हे महाविकास सरकार आहे अशी महाराष्ट्राच्या इतिहासात या सरकारची नोंद झालीय. आता राज्यातील 12 कोटी जनताच यांच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाही, असेदेखील भातखळकर म्हणाले.

इतर बातम्या :

Rajesh tope : राज्याला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा किती धोका? कोणते नवे नियम? आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीआधी म्हणाले…

खासगीकरणाच्या विरोधात सामूहिक लढा उभारा; छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आवाहन

शेतकऱ्याची कन्या होणार मंत्र्याची सून; गुलाबराव पाटलांच्या घरीही सनई चौघड्यांचे सूर

आर्थिक प्रगतीच्या बाबतीत तब्बल पंधराव्या स्थानी घसरला