‘सावधान! काँग्रेस आपल्या महाराष्ट्र विरोधात कट रचतेय’, चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप

"सध्या जेलमध्ये असलेल्या समाजकंटक मौलाना सलमान अझहरीच्या सुटकेसाठी आणि रामगिरी महाराज, नितेश राणे यांना यांच्या अटकेसाठी महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू झालेच आहेत. त्याची पूर्तता होईल. ही फक्त त्या मागण्यांची झलक आहे", असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

सावधान! काँग्रेस आपल्या महाराष्ट्र विरोधात कट रचतेय, चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप
चित्रा वाघ
Chetan Patil | Updated on: Nov 07, 2024 | 7:45 PM

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. “काँग्रेसने चक्क वोट जिहाद करण्याच्या बदल्यात ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या 17 मागण्या पूर्ण करण्याचे लेखी वचन ऑल इंडिया बोर्डला दिलं आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर घाव घालण्याचा सौदाच केला. 31 ऑक्टोबर 2024 ला ऑल इंडियाचे उलमा बोर्डाचे चेअरमन नायब अन्सारी फेसबुक पोस्ट पाहा. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की, ऑल इंडिया उलमा बोर्डाचा महाविकास आघाडीला पाठिंबा हवा असल्यास त्यांनी त्यांच्या 17 मागण्या मान्य कराव्या आणि सत्तेत आल्यावर त्या मागण्यांची पूर्तता करावी. अर्थातच सत्तांध झालेल्या काँग्रेसने त्या समाज विघातक सतरा मागण्या मान्य केल्या आणि महाराष्ट्राचा सौदा केला”, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

“याचा अर्थ जर महाविकास आघाडीच्या हाती सत्ता गेली तर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर झालेल्या अतिक्रमणाला हटवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेमध्ये ठराव मंजूर करतील. 2012 ते 2024 दरम्यानच्या दंगली संदर्भातील मुस्लिम समाजातील लोकांवर दाखल केलेले गुन्हे परत घेतील”, असा धक्कादायक दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

‘रामगिरी महाराज, नितेश राणे यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु’

“सध्या जेलमध्ये असलेल्या समाजकंटक मौलाना सलमान अझहरीच्या सुटकेसाठी आणि रामगिरी महाराज, नितेश राणे यांना यांच्या अटकेसाठी महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू झालेच आहेत. त्याची पूर्तता होईल. ही फक्त त्या मागण्यांची झलक आहे. मविआ सत्तेत आल्यास यांची एक एक मागणी पूर्ण होईल तेव्हा महाराष्ट्राची काय अवस्था होईल याचा विचार सुद्धा करवत नाही. त्यामुळेच समस्त महाराष्ट्रातल्या माझ्या मतदार बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणींनो वेळीच सावध व्हा”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या नराधमांच्या तावडीत देऊ नका. येत्या 20 तारखेला मतदानासाठी नक्की बाहेर पडा आणि महायुतीला मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र…!”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. चित्रा वाघ यांच्या या आरोपांवर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे आता महाराष्ट्राचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Follow Us