‘लापता गृहमंत्री’ ऐवजी ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ हा सिनेमा काढा; रावसाहेब दानवेंचा खोचक टोला
संजय राऊत यांना चॅनल आणि वर्तमान पत्रात झळकायचं असते, त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या बातम्या ते देत असतात. त्यांच्या बोलण्यावर मोदींची लोकप्रियता अवलंबून नाही. मोदींची लोकप्रियता कमी आणि जास्त होणे हे त्यांच्या हातात नाही अशा शब्दात भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची लोकप्रियता सोडा यांच्यासोबत राहणं आणि फिरणं म्हणजे लोक अपमान समजायला लागले आहेत अशी जहरी टीका भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केली आहे. संजय राऊत यांनी नुकतेच अमित शाह यांच्यावर ‘लापता गृहमंत्री’ असा चित्रपट काढणार असल्याची खोचक टीका केली होती. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘संजय राऊत यांनी अडीच वर्षाच्या काळात मंत्रालयात गेलेला ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ हा चित्रपट काढावा आणि त्याचे डायरेक्टर शरद पवारांना करावे असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
लोकसभेचे अधिवेशन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेच्या समस्या मांडण्यासाठी असते. त्याचबरोबर देशाचा कारभार पाहण्यासाठी असते. देशामध्ये पेपर फुटीचे प्रकरण व्हायला नको होते, जो प्रकार झाला तो वाईटच झाला. पण यापूर्वी सुद्धा पेपर फुटीचे प्रकार झालेले आहेत असेही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. विरोधकांनी सात दिवसांत एकदाही चर्चेत भाग न घेता, केवळ गोंधळ घातला. विरोधकांना पेपरशी कोणतेही घेणं देणं नाही, फक्त चॅनलवर वारंवार आले पाहिजे, यासाठी ते गोंधळ घालत आहेत. प्रसंग पडला तर प्रधानमंत्री सभागृहात येत असतात, परंतु पूर्णवेळ कोणताही प्रधानमंत्री संपूर्ण सभागृहसंपेपर्यंत सभागृहात बसून राहत नाही असेही दानवे यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गुंडाची टोळी तयार केली आहे असा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसयांनी आताच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे आणि त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातील मंत्र्यांची सुद्धा पार्श्वभूमी तपासली पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याविषयी विचारले असता रावसाहेब दानवे म्हणाले की खरे गुंड यांच्याच पक्षात आहे आणि यांच्याच मंत्रिमंडळात आहेत असा हल्लाबोलही रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांच्या सेनेवर केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मातीचे राजकारण केलं आणि नको त्यांना मातीतच मिळवलं आहे असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
ते कधीच कुणाला चांगलं म्हणत नाहीत
सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने ‘गुंगी गुडीया’ अशी टीका केली आहे. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी,’ अशा प्रकारची टीका एखाद्या राजकीय पक्षावर किंवा नेत्यावर करणं हे योग्य नाही. सुनेत्रा पवार राजकारणामध्ये नवीन आहेत. अजितदादा गेल्यानंतर त्यांची पोकळी भरून काढण्याचे काम पक्षाने त्यांच्याकडे दिले, त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्यमापन असं करता येणार नाही. सुनेत्रा पवार यांचं अशा प्रकारचं वर्णन करणं ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती आहे, ते कधीच कुणाला चांगलं म्हणत नाहीत अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
