“नौदल आणि तटरक्षक दलाला कोकणात मदतीसाठी बोलवण्यात दिरंगाई, ठाकरे सरकारची न्यायिक चौकशी करा”
गेल्या पाच दिवसात कोकणात पूरसदृश्य परिस्थिती असताना गुरुवारी दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र असे असताना राज्य सरकारने नौदल आणि तटरक्षक दलाला बोलवण्यासाठी शुक्रवारी पत्र दिले.
मुंबई : गेल्या पाच दिवसात कोकणात पूरसदृश्य परिस्थिती असताना गुरुवारी दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र असे असताना राज्य सरकारने नौदल आणि तटरक्षक दलाला बोलवण्यासाठी शुक्रवारी पत्र दिले. त्यामुळे वेळेत मदत न पोहोचल्यामुळे 200 पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हे अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारच्या या अनास्थेची आणि दिरंगाईची न्यायिक चौकशी करण्याची मागणी भाजपा मुंबई प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar demand to judicial inquiry on Delay calling Navy and Coast Guard for konkan flood victim help)
अतुल भातखळकर काय म्हणाले?
पावसाळा सुरू होतानाच कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या तुकड्या सज्ज असतात. राज्य सरकारकडून त्यांना आदेश येताच ते तात्काळ मदतकार्य सुरू करतात. बुधवारी रात्रीपासून संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेले होते. तर गुरुवारी सकाळी तळीये येथे दरड कोसळली होती. तर राज्य सरकारने तात्काळ तटरक्षक दल आणि नौदलाला मदतीसाठी लेखी आदेश देण्याची आवश्यकता होती.
राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारीच मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा केली. तसेच आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. पण निष्क्रिय आणि घरबस्या ठाकरे सरकारला मदतीचे पत्र लिहिण्यासाठी 24 तास लागले. ही दिरंगाई अक्षम्य असून अजून किती लोकांचे बळी घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येणार आहे? असा सवाल सुद्धा भातखळकर यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.
CM on Reached Mahad | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडमध्ये दाखलhttps://t.co/CltZQZ6Fvn#Raigad #UddhavThackeray #Landslide
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2021
(BJP MLA Atul Bhatkhalkar demand to judicial inquiry on Delay calling Navy and Coast Guard for konkan flood victim help)
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने महाडमध्ये, आता रस्तेमार्गे तळीयेच्या दिशेने
Hirkaniwadi landslide : रायगडमध्ये दुर्घटनांची मालिका सुरुच, आता हिरकणीवाडीत दरड कोसळली