रामरक्षा म्हटल्याने जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाहीत, भाजपच्या बड्या नेत्याने उडवली उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाची खिल्ली

BJP Politics : "56 लक्ष शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी देत आहोत,त्यात काही उणिवा नको, कोणी सुटता कामा नये, याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ही कर्जमाफी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आहे"

रामरक्षा म्हटल्याने जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाहीत, भाजपच्या बड्या नेत्याने उडवली उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाची खिल्ली
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 04, 2026 | 2:00 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उद्या रामरक्षा आंदोलनाची सुरुवात होणार आहे. दादरमधील मंदिरापासून हे आंदोलन सुरु होणार आहे. अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. नुकतीच ठाकरे गटात मोठी फूट पडली. सहा खासदार, एक आमदार साथ सोडून निघून गेले. त्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा हाती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे. पण भाजपचे बडे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाची खिल्ली उडवली. “उद्धव ठाकरे काय म्हणतील आणि काय म्हणतात त्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. पण रामरक्षा पठण करत असतील तर मला विश्वास आहे की जो जो रामरक्षा पठण करतो प्रभू राम त्यांचं रक्षण करतात. आता रामरक्षा म्हटल्याने जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाहीत असा मला विश्वास आहे” अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

“निश्चितपणे शिलापूजन करताना शिला घेऊन आम्ही गावोगावी फिरलो, तेव्हा तर व्यवस्थाही नव्हती. तेव्हा स्कूटरवर आम्ही गावात गेलो, कार सेवेत गेलो, बाबरी मज्जिद जेव्हा ध्वस्त होत होती. त्याचा मी साक्षीदार आहे” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. “माझ्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माझ्या पाठीशी राम मंदिर यही बनायेंगे असा संकल्प मी विवाहातही केला होता” असं मुनगंटीवार म्हणाले.

योगी आरोपींना कायद्याने रोगी केल्याशिवाय राहणार नाहीत

“जर तिथे दानपात्रात चोरी झाली असेल देव त्याला जी शिक्षा द्यायची ते देईलच. पण सरकार म्हणून अशांना कडक शिक्षा देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक वेळा सांगितलं की कोणी कसाही माणूस असू द्या. पण राम मंदिरात चोरी करणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही, योगी आरोपींना कायद्याने रोगी केल्याशिवाय राहणार नाहीत” असं मुनगंटीवार म्हणाले.

कारण त्या घटनेचा मी साक्षीदार नव्हतो

“56 लक्ष शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी देत आहोत,त्यात काही उणिवा नको, कोणी सुटता कामा नये, याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ही कर्जमाफी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आहे” असं मुनगंटीवार म्हणाले. अमित साटम यांच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. कारण त्या घटनेचा मी साक्षीदार नव्हतो असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Follow Us