पुन्हा राजकीय भूकंप? भाजप मित्रपक्षांची शिकार करणार… बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता एका बड्या नेत्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाष्य केले आहे.

पुन्हा राजकीय भूकंप? भाजप मित्रपक्षांची शिकार करणार... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
BJP Shinde
Image Credit source: Google
| Updated on: Apr 12, 2026 | 5:40 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. 2019 साली शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिवसेनेत बंड झाले, एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदार आमि मंत्र्यांना सोबत घेत भाजपसोबत युती केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवले. राज्याच्या राजकारणातील ही एक मोठा घटना होती. त्यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता एका बड्या नेत्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रोहित पवारांचा मोठा दावा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले की, भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.

भाजपवर निशाणा

महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील.

रोहित पवार यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आपल्या कोणत्या मित्रपक्षाची शिकार करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. रोहित पवारांचा दावा खरा ठरल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येऊ शकतो. त्यामुळे राजकारणात नेमकं काय घडणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

Follow Us