मोठी बातमी… शिंदे गट आणि भाजपमध्ये फाटलं… केसाने गळा कापल्याचा आरोप, निवडणुकीवर बहिष्कार; संभाजी नगरात नेमकं काय घडलं?

Shivsena vs BJP : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 21 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली.

मोठी बातमी... शिंदे गट आणि भाजपमध्ये फाटलं... केसाने गळा कापल्याचा आरोप, निवडणुकीवर बहिष्कार; संभाजी नगरात नेमकं काय घडलं?
Shinde and Fadnavis CH
Image Credit source: Google
| Updated on: Mar 18, 2026 | 4:54 PM

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये वेगवेगळी समीकरणे पहायला मिळाली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 21 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केला होता. दोन्ही पक्षांकडून जागांची जुळवाजुळव सुरु होती. अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसला आहे. अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची निवड झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आम्ही शिवसेनेला उपाध्यक्षपद देणार होतो – अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही बहिष्कार टाकला. या निवडणुकीनंतर बोलताना मंत्री अतुल सावे यांनी म्हटले की, भाजप-शिवसेनेची युतीची बैठक झाली, त्या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाठ आणि त्यांचे आमदार उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती अडीच वर्ष भाजपाचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष, त्याच पद्धतीने पुढच्या अडीच वर्षात शिवसेनेचा अध्यक्ष भाजपाचा उपाध्यक्ष असे ठरले होते. पण अचानक काय झालं मला माहिती नाही. तीन दिवसा अगोदर असं माहित झालं की, ते आमच्या पुरस्कृत उमेदवारांना फोन करून सांगत होते की, आपण वेगळं सरकार बनवणार आहोत, तुम्ही आमच्या सोबत याच पद्धतीने अपक्ष उमेदवारांना देखील त्यांनी फोन केले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आमच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते, तरी देखील शिवसेना त्यांना फोन करत होती.

शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आला

मी या संदर्भात पालकमंत्र्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी मला काहीच माहिती नाही असे सांगितले, त्यावेळी आमच्या लक्षात आलं की ते दुसर्‍या प्रयत्नात आहे. त्यामुळे आम्ही आमचे गणित जुळवायला सुरुवात केली. आमचे 23 आणि 2 पुरस्कृत सदस्य होते, तर एका उमेदवाराने आमच्याकडे प्रवेश केला होता तर दुसऱ्या उमेदवाराने पाठिंबाचे पत्र दिले होते, त्यानुसार 27 मतांचे आमचे गणित होते, यामध्ये राष्ट्रवादीचा आम्हाला पाठिंबा होता त्यामुळे एकच सदस्य आम्हाला बहुमतासाठी पाहिजे होता. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेऊन देखील त्यांच्या लक्षात आलं की, आपलं गणित बसत नाही. त्यांचं दुर्भाग्य असं की जे ठाकरे गटाचे लोक सोबत घेऊन गेले होते त्यातले काही लोक पळून गेले, त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे होते आम्ही त्यांना उपाध्यक्ष पद देणार होतो, ते त्यांनी घ्यायला पाहिजे होते.

त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही

अतुल सावे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही सकाळपर्यंत वाट पाहिली. ते आले नाही त्यांनी आम्हाला कॉल केला नाही संपर्कही केला नाही. त्यांना सकाळ पर्यंत आशा होती की आपले गणित जमलेले आहे. दोन आमदारांना त्यांच्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचे होते, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना मिस गाईड केले, पण तो आकडा त्यांना जमवता आला नाही. आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आला.

अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघ सांभाळावा

अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर बोलताना म्हटले की, आम्ही कोणताही विश्वासघात केला नाही त्यांना उपाध्यक्षपद मी देत होतो. सकाळपर्यंत ते आले असते तर आम्ही दिलं असतं. अब्दुल सत्तार यांना सांगा तुम्ही तुमच्या मतदारसंघ सांभाळा. 50% तुमच्या मतदारसंघात भाजप आलेली आहे. तुमच्या मुलाला अध्यक्ष करायचे होते म्हणून तुम्ही युती तोडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ठाकरे सेनेच्या लोकांना बाहेर घेऊन गेले.’

केसाने गळा कापला…

या निवडणुकीवर बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटले की, वरिष्ठ नेत्यांमध्ये उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली होती. अशा पद्धतीचा विश्वासघात पहिल्यांदा झाला. त्यांच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलं अध्यक्षपद देऊ, त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलो होतो. पण केसाने गळा कापला असं म्हणावं लागेल. पुढचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. उबाठा सोबत कोण गेले हे तुम्ही माहिती काढू शकता. या प्रक्रियेत विलास बापू आणि निरिक्षक होते. उद्धव ठाकरेंच्या सदस्यांना भाजपच्या नेत्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी आर्थिक व्यवहाराचा प्रयत्न केला असा आरोपही सत्तार यांनी केला आहे.

Follow Us