
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर असलेल्या छावा चित्रपटाचे कौतूक सर्वत्र होत आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. छावा चित्रपटामुळे समाजापुढे संभाजी राजांची ओळख देशभरातील युवा पिढीला झाली. आता या चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर आता राज्यातील सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होत आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सर्व आमदारांना मंत्रालयसमोर असलेल्या चित्रपट गृहात हा चित्रपट दाखवणार असल्याचे अजित पवार यांनी दिल्लीत सुरु असलेल्या अखील भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी सांगितले.
अजित पवार म्हणाले, वढू आणि तुळापूरला संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. संमेलानामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे, अशी टीका कायम होते. आम्ही संमेलनाला आर्थिक मदत उपकार म्हणून करत नाहीत, तर भाषेला समृद्ध करण्यासाठी करतो. मराठी भाषेला अभिजीत भाषाचे दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच संमेलन झाले. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
दिल्लीत साहित्यिकांसाठी एक भवन व्हायला हवे, अशी मागणी विजय दर्डा यांनी केली होती. त्याची दखल घेत अजित पवार म्हणाले, दिल्लीत मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी लागणार निधी मंजूर केला जाईल. हे भवन उभारण्याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिली जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्र सदन हे खासदार आमदार यांच्यासाठी आहे. परंतु दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती आहेत, त्यांना एकञित भेटण्यासाठी सभागृह पाहिजे, यासाठी अर्थसंकल्पनात हा विषय मांडणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छावा चित्रपट पहिला आहे. त्याबद्दल संमेलनाच्या समारोपात बोलताना ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्र्याचा असलेला छावा चित्रपट हिंदीमध्ये आहे. छावा पाहताना अंगावर शहारे येतात. हा चित्रपट मराठीमध्ये आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. संजय नहार यांच्या सरहद संस्थेच्या कामाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक करण्यात आले.