
बीडमधील ओबीसी समाजाच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते हजर होते. यावेळी आपल्या भाषणात, छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. ओबीसींचा डीएनए कधीही बदलू शकतो असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलताना नेहमी म्हणतात की, ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे. यावरून भुजबळ यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. भुजबळ म्हणाले की, 2 सप्टेंबरला एक जीआर काढला. माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे. जातीचं. 3 ऑक्टोबर 2025 ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3 तारखेला संध्याकाळी जातप्रमाणपत्र मिळालं. अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी. अनेक सर्टिफिकेट चेक केले? मी सीएम साहेबांना सांगितलं. मी महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं. म्हटलं एवढे फास्ट अधिकारी या देशात कसे जन्माला आले. आम्हाला दहा महिने लागतात. यांना दहा तासात. हे थांबवलं नाही ना, लक्षात ठेवा. तुम्ही सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सरकेल काही सांगता येत नाही.
भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, ‘माझ्याकडे हायकोर्टाचा निर्णय आहे. मराठा आणि कुणबी जात नाही. दुसऱ्या निर्णयात कोर्ट म्हणतं मराठा आणि कुणबी एक जात आहे मानने मूर्खपणा आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले, मराठा समाज मागास नाही. त्यांना आरक्षण देता येत नाही. भाजपच्या नेत्यांना सांगतो, आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 135 आमदार मिळाले. त्या ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी दुधखुळे राहिले नाही. त्यामुळे लवकरात लवकर यात मार्ग काढावा लागेल.’
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘आम्ही त्यांना सोडणार नाही. भाजपला सांगतो तुमच्या नेत्यांना आवरा. आम्ही रस्त्यावर लढू. कोर्टात लढू. आम्ही किती गप्प बसायचं. त्याने बोललेलं चालतं. आम्ही बोललो तर आम्ही जातीवादी. आरक्षणाला कुठे धक्का लागला. हे सांगता. दोन लाख लोक आले. अजून दोन लाख यात टाकले तर आमच्या मानगुटीवर बसणार नाही. तुम्हाला बाहेर नाही काढलं. तुमच्या मानगुटीवर यांना बसवलं. वेडे समजले का आम्हाला. अख्ख आयुष्य गेलं लढण्यात. मूर्ख समजू नका. बंजारा समाजाने एक आवाज दिल्यावर आदिवासी समाज उठला. त्यावर बोलायचं नाही. आम्ही मात्र गप्प बसायचं आणि मराठा समाजाला बोकांडी बसवून घ्यायचं. कुठला न्याय आला.’