त्यांनी मारलं हो पोरीला…पुण्याच्या शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिलांच्या आरोपांनी एकच खळबळ!
चिंचवडमध्ये १७ वर्षांच्या संसारानंतर शिल्पाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालमत्तेच्या वाट्यासाठी आणि पैशांसाठी पती, सासू-सासरे आणि दिराने अमानुष छळ केल्याचा आरोप शिल्पाच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, गवारे कुटुंबावर गंभीर आरोप आहेत. शिल्पाच्या कुटुंबियांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

रणजित जाधव, प्रतिनिधी : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणावरून पेटलेला संताप अद्याप धुमसत असतानाच आता पिंपरी-चिंचवडमध्ये हुंडाबळीचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. उच्चभ्रू कुटुंबातील शिल्पा गवारेचा बळी गेला आहे. या हुंडाबळीने पिंपरी चिंचवड पुन्हा हादरली आहे. विवाहीत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आता शिल्पाचा पती, सासू-सासरे आणि दिराविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून वाकड पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. शिल्पाच्या मृत्यूमुळे तिच्या माहेरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिल्पाच्या जाण्याने दोन मुलांचं भवितव्यही अंधारात आहे. 17 वर्षांच्या संसारानंतर शिल्पाचा झालेला हा दुर्दैवी अंत चटका लावणारा ठरला असून अतिशय हळहळ व्य़क्त होत आहे. तिच्या जाण्यामुळे आई-वडील हादरले असून त्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केलेत. माहेरच्या संपत्तीत हिस्सा माग असं म्हणत मुलीचा अतोनात छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरण वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे.
ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप शिल्पाच्या कुटुंबीयांनी केलाय आणि वाकड पोलिसांनी ही हत्येच्या दृष्टीने तपास सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे पती सचिन वर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल होता, हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. आता शिल्पाच्या मृत्यूप्रकरणात पती, सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आई-वडिलांना अश्रू अनावर
वाकडमधीलचं गवारे कुटुंबीयांनी शिल्पाचा अमानुष छळ केला. पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दिर संदीप या हैवनांनी सतरा वर्ष शिल्पाचा छळ केला. पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दिर संदीप या हैवनांनी सतरा वर्ष शिल्पाचा छळ केलाय. दोन एकर जमीन, व्यवसायात हातभार आणि वारंवार लाखो रुपयांची रोकड ज्याचा हिशोबचं लावता येणार नाही. मात्र तरी ही गवारे कुटुंबीयांचा हव्यास मिटता मिटला नाही, असा आरोप त्यांनी केला.
माझ्या मुलाला राखी बांधायला कोण ?
माझ्या मुलीचा (शिल्पा) त्यांनी खूप छळ केला, कधी इस्त्री घातली तर एकदिवस तिला चटके दिले त्यांनी. सारखं तिच्यापाठी काहीतरी चालूच असायचं. तिला खूप मारहाण करायचे, सासू-सासरे खाली रहात असले तरी वर येत नव्हते बघायला की काय चाललंय. आपला मुलगा दारूडा आहे, वर भांडणं चालली आहेत, तिथे जाऊन बघावं, भांडण मिटवावं , असा कधीच त्यांनी प्रयत्ने केला नाही, ते उलट त्याला प्रोत्साहन देत होते.तुझ्या बापाकडून आण पैसे, प्रॉपर्टीत हिस्सा, असं तिला सांगायचे, असा आरोप तिच्या आईने केला. मी मरने पण मी काही आणणार नाही, मला मारलं तरी चाले, असं माझी मुलगी म्हणायची. आज माझी मुलगी नाही, माझ्या मुलाला राखी बांधायला कोणी उरलं नाही, असं म्हणताना त्या माऊलीच्या डोळ्यातील पाण्याला खळ नव्हता.
पैसे दिले, सगळं दिलं तरी माझ्या पोरीचा जीव गेला
पैसे दिले, बरच काही मागत होते, ते दिलं, पण हिश्श्यापायी माझ्या पोरीला मारून टाकलं त्यांनी. आमची पोरगी गेली आता, काय उरलं आमच्याकडे. पण त्यांना (आरोपी) कठोरात कठोर शासन व्हावं, एखाद्या दुसऱ्या मुलीला असा त्रास सहन करावा लागू नये, म्हणून त्यांना कठोर शिक्षा व्हावी एवढीच आमची इच्छा आहे, असं शिल्पाच्या आई-वडिलांनी सांगितलं.