सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी
दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET) संदर्भात 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांची प्रकृती अत्यंत खालावली . त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र, भाजप महिला नेत्याने थेट "त्यांना अटक झाली" असा दावा केल्याने नेटकऱ्यांनी त्यांची फिरकी घेतली आहे.

विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज सकाळी पोलिसांनी उपोषणस्थळावरून उठवून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेथे ते सध्य डॉक्टरांच्या निगराखाली आहेत. मात्र वांगचुक यांना अशा पद्धतीने नेल्याने जंतर मंतर येते गदारोळ माजला असून आता CJPचे संस्थापक अभिजीत दिपके उपोषणास बसले आहेत. याच मुद्यावरून सिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत दडपशाहीचा आरोप केला होता. तसेच नागपूरमधील रामरक्षा आंदोलनावर लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना उपोषणस्थळावरून रुग्णालयात नेण्यात आलं असा आरोपही राऊतांनी केला. त्यावरून वाद पेटला असून आता भाजप नेत्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णालयात नेले, यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या संवेदनशील मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाने (उबाठा) केलेल्या एका दाव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर थेट पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांनी उबाठा गटाच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. मात्र त्यांच्या विधानामुळे त्याच अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत.
आमदार चित्रा वाघ यांची मूळ इन्स्टा पोस्ट:
चित्रा वाघ यांनी विरोधकांना धारेवर धरताना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की:
“आता सोनम वांगचुक ह्यांच्यावर कारवाई होताच रडत राऊतांचे नेहमीचे रडगाणे सुरू झाले! म्हणे, “नागपुरात उबाठा शिल्लक गटाचे आंदोलन सुरू असल्यामुळेच अटक झाली.” काय ते तारे तोडायचे? स्वतःला रामरक्षेच्या चार ओळीही नीट म्हणता येत नाहीत, पण आंदोलनाच्या नावाखाली राजकारण मात्र जोरात! बहुतेक रामरक्षा म्हणावी लागेल या धास्तीनेच असे बिनबुडाचे आरोप सुरू झाले असावेत.
फालतू टोमणेबाजी करण्यात सरावलेल्या जिभेवर रामरक्षा सहज येत नसते… आणि म्हणूनच सत्यापासून लक्ष विचलित करण्याचे हे नवे नाटक सुरू आहे.”
लोकप्रतिनिधी असूनही वस्तुस्थितीची जाण नाही?
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना केवळ वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णालयात नेले असताना, आमदार चित्रा वाघ यांच्या विधानामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला. कायदेशीर अटक आणि आरोग्यासाठी ताब्यात घेणे यातील फरक लोकप्रतिनिधीला समजू नये का, असा सवाल करत युजर्सनी भाजप नेत्याच्या संवेदनशीलतेवर आणि ज्ञानावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्या असलेल्या चित्रा वाघ यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी विरोधकांच्या त्याच ‘अटक’ या चुकीच्या शब्दाचा आधार घेत थेट रामरक्षेचा संदर्भ देऊन खोचक टोमणेबाजी सुरू केली. कायदेशीर अटक आणि केवळ वैद्यकीय कारणास्तव न्यायालयाच्या आदेशाने रुग्णालयात दाखल करणे यातील मूलभूत फरक एका जबाबदार आमदाराला समजू नये का, असा सवाल आता नेटकरी उपस्थित करत आहेत.
नेमका काय आहे हा संपूर्ण वाद?
देशातील परीक्षा पद्धतीमधील कथित अनियमितता आणि नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाचा निषेध म्हणून सोनम वांगचूक अन्नत्याग उपोषणावर बसले होते. काहीही न खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. अखेर दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून केवळ वैद्यकीय उपचारासाठी ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्यांना कोणत्याही गुन्ह्याखाली कायदेशीररित्या अटक केलेली नाही, तर केवळ प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेले आहे.
मात्र, या कारवाईचा संबंध नागपुरात सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या आंदोलनाशी जोडत उबाठा नेत्यांनी सरकारवर टीका केली होती. यावरच पलटवार करत चित्रा वाघ यांनी विरोधकांचे हे दावे पूर्णपणे “बिनबुडाचे” आणि “सत्यापासून लक्ष विचलित करणारे नाटक” असल्याचे म्हटले आहे.