अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी आतली बातमी सांगितली

| Updated on: Jan 24, 2023 | 6:52 PM

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी आतली बातमी सांगितली
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिल्लीत बोलावलं होतं. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अमित शाह केंद्रीय सहकार मंत्रीदेखील आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्याकडून उपाययोजना केल्या जात आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या बातम्या नेहमी समोर येत असतात. याचाच विचार करुन अमित यांनी आज सहकार क्षेत्रासी संबंधित महत्त्वाची बैठक बोलावली. सहकार क्षेत्राशी संबंधित बैठकीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुखज विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, अभिमन्यू पवार, धनंजय महाडिक हे सुद्धा नेते दिल्लीत अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. या बैठकीनंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाली. या बैठकींमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

अमित शाह यांच्यासोबतची बैठक आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शाह यांच्या शासकीय कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

“आम्ही अमित शाह यांचे आभार मानतो. अतिशय तातडीची बैठक त्यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या संदर्भात घेतली. या बैठकीत मार्जिंग आणि वर्किंग कॅपिटल, इनकम टॅक्सचे पेंडिंग विषय, लोनचा विषय, असे चार-पाच विषय आहेत. साखर उद्योगामध्ये असलेल्या अडचणी आणि त्यांना सशक्त करण्यासाठीच्या योजना यावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

“केंद्रीय सहकार मंत्र्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. लवकरच आठवड्याभरात चांगला निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योजक, शेतकरी यांना सर्वांना दिलासा मिळेल. साखर उद्योग सक्षम झाला पाहिजे, या उद्देशाने बैठक झाली”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“आता फक्त साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र यावर चर्चा झाली”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर जास्त बोलणं टाळलं. पण पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला असता मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असं शिंदेंनी सांगितलं.

‘मविआ सरकार काळात मला अटक करण्याचे प्रयत्न’, फडणवीसांचं मोठं विधान

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला अटक करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न झाले. त्यासाठी तत्कालीन मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी दिली होती. त्यातून आपल्या अडकवण्याचे बरेच प्रयत्न झाले. पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील माहिती आहे, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.