‘महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो, कोरोनाला एकवटून हरवूया’, मुख्यमंत्र्यांचं खासगी रुग्णालयांना आवाहन

| Updated on: Apr 09, 2021 | 8:57 PM

महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोना विरुद्ध अशाच प्रकारे एकवटून त्याला हरवू या," असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो, कोरोनाला एकवटून हरवूया, मुख्यमंत्र्यांचं खासगी रुग्णालयांना आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई :कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोना विरुद्ध अशाच प्रकारे एकवटून त्याला हरवू या,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ञ डॉक्टर्स यांना केले. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकीत खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ज्ञांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते (CM Uddhav Thackeray appeal private hospitals and doctors to unite to defeat Corona in Maharashtra).

आता कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केलयं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवस रात्रं रुग्णसेवा करीत आहात. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली आणि कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला आहे. त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे.”

जम्बो कोविड सेंटर्स खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे

“कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा. शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे. या सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटर्संविषयी असलेली भावना दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. ही एकजूट सर्व थरांमध्ये आणताणाच कोरोनाला हरवायचंय यात खासगी रुग्णालयं महत्वाचा दुवा आहे,” असं मुख्यमत्र्यांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी बोलताना म्हणाले, “कोरोनाच्या उपचारात खासगी रुग्णालयांचे योगदान मोठे आहे. आताच्या परिस्थितीत मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे अतिरीक्त बेडची सुविधाही निर्माण करावी. जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवितानाच प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे. त्या माध्यमातून बेडची उपलब्धता दिसली पाहिजे. खासगी रुग्णालयांनी रेमडीसीवीरचा वापर जपून करावा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना ते देऊ नये.”

“राज्य शासनाने चाचण्यांवर, उपचारांच्या दरांवर नियंत्रण आणले आहे. त्याचे पालन होणे गरजेचे आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च वाढणार नाही याची दक्षती खासगी रुग्णालयांनी घ्यावी. छोट्या शहरांसाठी ई आयसीयू उपयुक्त ठरणार आहे. त्याचा वापर वाढविण्याची गरज आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“सेवानिवृत्त डॉक्टर्स, नर्सला काही काळासाठी पुन्हा सेवेत घ्यावे”

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, “उपचाराच्या सुविधा वाढविताना मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी जे डॉक्टर्स, नर्स निवृत्त झाले आहेत त्यांना पुढील 3 किंवा 6 महिन्यांसाठी सेवेत सामावून घेण्याविषयी प्रयत्न करावेत. त्यामुळे अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल. खासगी रुग्णालयांनी याकाळात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड यांचा विस्तार करावा. राज्यात 20 ते 25 वैद्यकीय महाविदयालयांची रुग्णालये आहेत. जेथे शक्य असेल तेथे तातडीने व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन बेड विस्ताराचे काम हाती घ्यावे.”

“या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दुसरी लाट आणखी किती काळ राहील याचा अभ्यास करावा. जेणेकरून उपाययोजना करण्यामध्ये त्याचा उपयोग होईल. छोट्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचे दर देखील नियंत्रणात असले पाहिजे. महानगरातील आणि छोट्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील दर भिन्न असले पाहिजे. टास्कफोर्सचा जो उपचाराचा प्रोटोकॉल आहे. तो खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी अमलात आणावा जेणेकरून औषधांची टंचाई जाणवणार नाही,” असंही देशमुख यांनी सांगितलं.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे,सचिव आबासाहेब जराड, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, धर्मदाय आयुक्त चौरे, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडीत उपस्थित होते.

हेही वाचा :

Maha SSC HSC Exam : विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : शिक्षणमंत्री

ना ऑक्सिजन बेड, ना व्हेंटिलेटर, शहर शहर एकच खबर, वाचा महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरात काय स्थिती?

रुग्ण वाढल्यास मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर सुरु करा; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray appeal private hospitals and doctors to unite to defeat Corona in Maharashtra