निजामकालीन शाळांची डागडुजी, रस्तेही सुधारणार, औरंगाबादचं रुपडं पालटणार, मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिले ?

| Updated on: Sep 09, 2021 | 8:26 PM

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप आता बदलणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारणार असून सातारा-देवळाई मधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही दूर होणार आहे. 

निजामकालीन शाळांची डागडुजी, रस्तेही सुधारणार, औरंगाबादचं रुपडं पालटणार, मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिले  ?
aurangabad uddhav thackeray
Follow us on

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप आता बदलणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारणार असून सातारा-देवळाई मधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही दूर होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथील बैठकीत औरंगाबादच्या विविध विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे संत परंपरा आणि साहित्याच्या अभ्यास-संशोधनाला चालना मिळणार आहे. औरंगाबाद- अहमदनगर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री सांगितले. (cm uddhav thackeray meeting and decision on aurangabad city progress know all about ahmednagar shirdi railway route aurangabad road government school)

संतपीठ हे विद्यापीठ व्हावे

पैठण येथे संत एकनाथ महाराज संतपीठाची इमारत तसेच वसतिगृह तयार आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू झालेला नाही, असे निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या संत साहित्याच्या अभ्यासकांना एकत्र बोलावून चर्चा व्हावी. तसेच अशांच्या सहभागाने ट्रस्टची पुनर्रचना करावी. राज्याचे संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या या संतपीठात शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. हे संतपीठ विद्यापीठ व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अधिक पाठपुरावा करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले.

निजामकालीन शाळांचे रूप बदलणार

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 144 शाळांच्या इमारती निजामकालीन असून, त्यातील बहुतांश मोडकळीस आलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या शाळांच्या पुनर्बांधणी आणि दुरूस्तीचा शाश्वत कार्यक्रम हाती घेऊन ठोस आणि चिरकाल टिकणारी गोष्ट करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील रस्ते सुधारणार

यावेळी मनपा आयुक्त पांडे यांनी शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी 382 कोटी रुपये आणि शहरातील विविध मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317.22  कोटी रुपये निधी आवश्यक असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी ही कामे तातडीने नगरविकास विभागास महाराष्ट्र नगरोत्थान निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन

औरंगाबाद शहरातील बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन उभारणीच्या कामाचा आढावादेखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच हे स्मृतीवन स्थानिक वृक्षसंपदेच्या जतनासाठी तसेच पक्षी उद्यान म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गुंठेवारीची प्रकरणे वेगाने सोडवा

महापालिका आयुक्तांनी औरंगाबादमध्ये गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला असून, 52  संस्थामार्फत विभागनिहाय प्रस्ताव प्राप्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. त्यावर गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

औरंगाबाद सफारी पार्क

औरंगाबाद सफारी पार्क जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क होण्यासाठी तसे वेगळेपण निर्माण करावे, विविध प्राणी त्याठिकाणी असावेत यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत सूचना दिल्या. प्राणी उद्यान व सफारीसाठी जमिनीची मागणी महापालिकेने केली आहे. त्यादृष्टीने वन विभागाच्या समन्वयाने ही कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.

औरंगाबाद –अहमदनगर रेल्वे मार्ग

सध्या औरंगाबाद-मनमाड-अहमदनगर असे 265 किलोमीटरचे रेल्वेचे अंतर आहे. याला पर्याय म्हणून औरंगाबाद –अहमदनगर असा 112 किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग झाल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि व्यापारास चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. डीएमआयसी आणि ऑरिक सिटीमंधील उद्योगाशी निगडित मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सध्या रस्ते मार्गे होते. ती या प्रस्तावित रेल्वेमार्गे झाल्याने वेळेची आणि खर्चाची बचत होणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्याची व्यवहार्यता तपासली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गासाठी राज्य सरकारकडून सर्व ते सहकार्य देण्यात येईल असे सांगितले.

औरंगाबाद –शिर्डी हवाई मार्ग

नेते बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे औरंगाबाद ते शिर्डी हे 112.40 किलोमीटरचे काम वेगाने पूर्ण होत असून औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडले जाईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद –शिर्डी या मार्गावर विमानसेवा सुरु झाल्यास पर्यटकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असून, याही पर्यायाचा विचार करावा असे सांगितले.

घृष्णेश्वर मंदिर विकास, सिथेंटीक ट्रॅकसाठी ग्रीन सिग्नल

घृष्णेश्वर मंदिर परिसरातील सभामंडपाच्या बांधकामासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश दिले. तसेच विभागीय क्रीडा संकुलातील सिथेंटिक ट्रॅकचे काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रीया पूर्ण करावी असेही सांगितले.

विकास कामे वेगाने पूर्ण करणार – पालकमंत्री देसाई

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेकडील निजामकालीन इमारतीतील शाळांची दुरूस्ती करून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामे वेगाने पूर्ण करताना, त्याचा दर्जा टिकवून ठेवला जाईल. जिल्ह्यातील उद्योग, कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच आमदार संजय शिरसाट यांनीही विकास कामांसंदर्भात सूचना केल्या.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी प्रगतीपथावरील तसेच विविध प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण केले.

इतर बातम्या :

राणे कुटुंबाबाबत लूकआऊट सर्क्युलर, आता नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर, ठाकरे सरकारला इशारा

केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा, नाना पटोलेंचं साताऱ्यातून जनतेला आवाहन

प्रियकरासोबत वारंवार वाद, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाण, विवाहितेचं टोकाचं पाऊल, पिंपरी चिंचवड हादरलं

(cm uddhav thackeray meeting and decision on aurangabad city progress know all about ahmednagar shirdi railway route aurangabad road government school)