ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा…नाशिकमध्ये मौसम सुहाना; मंतरलेल्या चोरपावलानं थंडीचं आगमन!

| Updated on: Oct 24, 2021 | 3:08 PM

गेल्या कित्येक दिवसांपासून ऑक्टोबर हिटचे चटके सोसणाऱ्या नाशिकमध्ये अखेर दिवाळीच्या तोंडावर मंतरलेल्या चोरपावलानं गुलाबी थंडीचं आगमन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा घसरत असून, राज्यात सर्वात नीचांकी 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथे झाली आहे.

ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा...नाशिकमध्ये मौसम सुहाना; मंतरलेल्या चोरपावलानं थंडीचं आगमन!
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पारा घसरला आहे.
Follow us on

नाशिकः गेल्या कित्येक दिवसांपासून ऑक्टोबर हिटचे चटके सोसणाऱ्या नाशिकमध्ये अखेर दिवाळीच्या तोंडावर मंतरलेल्या चोरपावलानं गुलाबी थंडीचं आगमन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा घसरत असून, शनिवारी चक्क राज्यात सर्वात नीचांकी 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथे झाली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून झोडपून काढणाऱ्या पावसापासून नाशिककरांची सुटका झाली आहे. रविवारी तर दुपारनंतर ढगाळ वातावण आणि हवेत गारठा जाणवत होता. आता एकंदर हवामान बदलले आहे. मौसम सुहाना झाल्यामुळे सकाळी बाहेर फिरायला जाणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. गोदाकाठावर अनेक ठिकाणी रात्री व पहाटे शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.. उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. जवळपास 25 ऑक्टोबरनंतर पावसाळी वातावरण हटण्याचे भाकित व्यक्त करण्यात आले होते. आता नेमके तसेच घडले असून, पावसाळी वातावरण हटले आहे. जिल्ह्यात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे.

अतिवृष्टीचे थैमान

अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्यात यावर्षी अक्षरशः थैमान घातले. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख 71 हजार हेक्टरवरचे पीक पाण्यात गेल्याचे पंचनाम्यातून उघड झाले आहे. त्याचा तडाखा जिल्ह्यातील दोन लाख 24 हजार 919 शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानीचे भयावह आकडे आता समोर येत आहेत. जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवचे पीक पाण्यात गेले आहे. या नुकसानीपोटी जिरायती पिकासाठी मदत म्हणून 8957.01 लाखांची मागणी करण्यात आली आहे. बागायत पिकासाठी 4367.98 लाखांच्या निधीची मागणी केली आहे. वार्षिक फळपिकांसाठी 18.35 लाख, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी 1377.99 लाखांची अशी एकूण 147 कोटी 21 लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.

थंडीचाही कहर होणार

नाशिककरांना यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. एकाच महिन्यात मनमाड, नांदगावसारख्या ठिकाणी दोनदा अतिवृष्टी झाली. शिवाय जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. गोदावरी नदीला यंदा महिनाभरात चार पूर आले. हे पाहता आता येत्या काळात थंडीही जोरदार पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसाप्रमाणेच थंडीचा सुद्धा कहर होऊ शकतो. हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहेत.

इतर बातम्याः

नाशिक जिल्ह्यातील दहा गावे भूकंपाने हादरली; दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांमध्ये भीती

प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिवाळीनंतर होणार जाहीर; नाशिकमध्ये इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास