औरंगाबाद: मान्सूनच्या सुरुवातीला पावसानं असामनता दाखवली, मात्र शेवटच्या टप्प्यात मराठवाड्यात सर्वदूर वृष्टी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश धरणे (Dams Over Flow in Marathwada) भरली आहेत. नाशिक परिसरातही भऱपूर पाऊस (Heavy rain in Nashik) झाल्याने जायकवाडीची पाणीवातळीही चांगलीच वाढली आहे. तसेच परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेडमधील धरणंही तुडुंब भरल्याने याचा लाभ परिसरातील सर्वच गावांना मिळणार आहे.
नाशिक, अहमदनगरमध्ये झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळवंडे ही धरणं भरली आहेत. गंगापूरहून 6,686 तर दारणा धरणातून 2,500 क्युसेक विसर्ग सुरु आहे. नांदूर-मध्यमेश्वर प्रकल्पातून 36 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा 75 टक्के झाला आहे. जायकवाडीच्या वरच्या भागात पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच राहिला तर धरण 100 टक्के भरेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी धरणात 43 दलघमी पाण्याची आवक झाली.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्येही सततच्या पावसामुळे धरणं तुडूंब भरली आहेत. त्यामुळे धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरु झाला आहे. बुधवारी माजलगाव धरणाचे 5, येलदरीचे 10 आणि इसापूर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले. या धरण क्षेत्रांमध्ये अजूनही पावसाची रिपरिप सुरुच असल्यामुळे आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र धरणं काठोकाठ भरल्यामुळे हिंगोली, नांदेड, परभणीसह विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील लाखो हेक्टर पिकांना याचा फायदा होणार आहे.
नांदडच्या प्रसिद्ध डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातूनही बुधवारी सायंकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरु झाला. यावेळी धरणाचे 5 दरवाजे उघडले होते. 1884 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात आला. यापूर्वीही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले होते.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून 26 हजार 208 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नाशिकमध्ये झालेल्या पावसाचा परिणाम मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात होतो. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून टप्प्या-टप्प्याने 8000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे बुधवारी गोदावरी नदीला पूर आला. नाशिकमधील पुराचे दर्शक मानला जाणारा दुतोंड्या मारुती सायंकाळी बुडाला. दरम्यान, खळखळून वाहणाऱ्या गोदेचे रुप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (Dams in Marathwada filled due to continuous rain in Marathwada and Maharashtra state)
इतर बातम्याः
Aurangabad Rain | औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत