Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
मीरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटाने भीषण आग लागून 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. शॉर्ट सर्किटमुळे रात्री लागलेल्या या आगीत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाने आग विझवल्यावर, घटनास्थळी 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा धक्कादायक साठा सापडला, ज्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

मुंबईतील मिरा-भाईंदर येथे अतिशय दुर्दैवी आणि हादरवणारी घटना घडली आहे. मिरा-भाईंदर येथे सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या तसेच बरेच लोक जखमीही झाले. त्यापैकी 3 जणांना या अग्नितांडवामुळे जीव गमवावा लागला. इंद्रलोक फेज 4 मधील आरक्षित भूखंडावरील झोपडपट्टीत काल रात्री 8 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीमुळे एकापाठोपाठ एक 3 असे सिलेंडरचे भीषण स्फोट झाले, ज्यामुळे काही क्षणात वस्ती भस्मसात झाली.
आग पसरल्याने सर्व जजण सैरावैरा पळू लागले, झोपड्या, घरातलं सामान क्षणात जळून भस्मसात झालं आणि उरली ती फक्त राख. अनेक झोपड्या जळाल्या, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र तोपर्यंत बरच नुकसानझालं होतं. अखेरी अथक प्रयत्नांनी, आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं.
3 जणांचा मृत्यू
रात्री लागलेल्या या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला. आगीमुळे ते प्रचंड होरपळले होते, जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. या आगीत उत्तर प्रदेशचे गुड्डू राम (वय 46) आणि पश्चिम बंगालचे सुरज लियाकत अली मंडळ (वय 14),रोहित रहेमत अली मंडळ (वय15) असे दोन अल्पवयीन मुलांचा मिळून एकूण 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
सापडले 24 सिलेंडर
दरम्यान ही आग विझवल्यानंतर समोर जे दृश्य दिसलं त्याने सगळेच चक्रावले. कारण ज्या झोपडपट्टीमध्ये आग लागली होती, त्या परिसरात तपासादरम्यान 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडल्याने खळबळ उडाली. एकीकडे देशात गॅसचा तुटवडा असताना झोपडपट्टीत इतका मोठा साठा कुणी आणि का केला? याचा तपास सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 24 सिलेंडर जप्त केले असून पुढील तपास करण्यात येत आहे.