काँग्रेसकडून शिखांवर अत्याचार, शेवटपर्यंत निषेध करत राहू, फडणवीस यांचे मोठे विधान!

शिखांचा दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये, संपूर्ण भारताने कत्लेआम झाला. काँग्रेसच्या नेतृत्त्वात हा कत्लेआम झाला, सत्य असून ते कोणालाही विसरता येणार नाही. गिरीश महाजन यांचे पूर्ण वक्तव्य पाहिले तर प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

काँग्रेसकडून शिखांवर अत्याचार, शेवटपर्यंत निषेध करत राहू, फडणवीस यांचे मोठे विधान!
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2026 | 2:55 PM

Girish Mahajan Statement : भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस आहे, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून महाजन यांच्यावर टीका करण्यात आली आहे. खासदार शरद पवार यांनीदेखील गिरीश महाजन यांच्या मताशी असहमती व्यक्त करत चांगलंच सुनावलं आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांचे विधान आणि शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या काळात शिखांवर अन्याय, अत्याचार झाला याचा निषेध आम्ही जन्मभर करत राहू, असे फडणवीस म्हणाले.

ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम केलं, त्यांच्या मालिका बंद केल्या जात आहेत. काँग्रेसने, काही लोकांनी शिखांवरती अन्याय केला, असे वक्तव्य करून सबंध देशाची बेअब्रु करण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रातून पंजाबमध्ये जाऊन अशी वक्तव्ये केली जात आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांना सुनावलं आहे. याबाबत विचारलं असता, “शरद पवार काय म्हणाले हे मी ऐकलं नाही. त्यांचं भाषणही मी ऐकलं नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया दिली तर ते योग्य होणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो की ज्या प्रकारे काँग्रेसने शिखांवर अत्याचार केला त्याचा निषेध आम्ही जन्मभर करू, शेवटपर्यंत करू, असे फडणवीस म्हणाले.

 

तसेच, शिखांचा दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये, संपूर्ण भारताने कत्लेआम झाला. काँग्रेसच्या नेतृत्त्वात हा कत्लेआम झाला, सत्य असून ते कोणालाही विसरता येणार नाही. गिरीश महाजन यांचे पूर्ण वक्तव्य पाहिले तर प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत. शिखांचे नववे गुरू आहेत, त्यांचा 300 वा शहिदी दिवस संपूर्ण देशात साजरा केला जात होता. महाराष्ट्राने त्या संदर्भात या समारोहासाठी मोठे कार्यक्रम घेतले. पंजाबमधून गिरीश महाजन यांना एक निमंत्रण आले होते. आम्हाला महाराष्ट्र सरकारचा गौरव करायचा आहे, असे सांगण्यात आले होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

तसेच गिरीश महाजन यांनी तिथे जाऊन दर्शन घेतले. या कार्यक्रमाच्या पाठीशी कोण आहेत, पाठीमागे कोणाचा फोटो लागलेला आहे, त्याची कल्पना नव्हती. अतिशय थोडा वेळ ते त्या कार्यक्रमात होते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी शीख समाजाचा गौरव केला आहे. भारताच्या वाटचालीत शीख समाजाचे योगदान, शीख समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासासाठी भारत सरकारचे योगदान, पंजाबमधील ड्रग्सचा वाढता प्रश्न यावर विधान केले आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या या विधानांकडे अन्य दृष्टीकोनातून पाहण्याची गरज नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Follow Us