
मोठी बातमी समोर येत आहे, माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीमधल्या प्रचारसभेत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची आठवण काढली आहे. एक व्यक्ती आपल्या सोबत नाही, याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यात आहे. संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपीचा धनंजय मुंडेंना एवढा कळवळा का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एखाद्या प्रकरणात एखाद्या व्यक्तीचा संबंध नाही, मात्र तो माणूस पिसला जातो असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना नेमकं काय म्हणायचं आहे? असा सवालही त्यानंतर उपस्थित करण्यात येत आहे.
परळीमध्ये झालेल्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण आली आहे, जगमित्र हे कार्यालय 24 तास सर्वांसाठी खुलं असायचं. आताही कार्यालय सुरू आहे. पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, याची जाणीव आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. परळीच्या जगमित्र कार्यालयात बसूनच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचं काम पहायचा. वाल्मिक कराड हा याच कार्यालयात बसून सर्व सूत्र हलवायचा, धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभांची सगळी तयारी सुद्धा वाल्मिक कराडच करायचा. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे, सध्या वाल्मिक कराडा हा बीडच्या कारागृहात आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
24 तास जगतमित्र सुरू होतं, जे काय असेल नसेल, गोरगरिबाला आपण मदत करत होतो. आज नऊ दहा महिने झाले, कार्यालय चालू आहे, काम सुरू आहे. हे सर्व सुरू असताना आपला एक व्यक्ती आपल्यासोबत नाहीये, याची जाणीव होते. असं यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो सध्या बीडच्या कारागृहामध्ये आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.