शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Shiv Sena UBT : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांतराचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. धाराशिव नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
Shivsena ubt and bjp
Image Credit source: Google
| Updated on: Aug 24, 2026 | 10:41 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. अनेक नेत्यांना आपापल्या सोयीनुसार पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांतराचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. कळंबनंतर आता धाराशिव शहरातही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धाराशिव नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चार नगरसेवक भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी धाराशिवमधील चार नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या (मंगळवारी) मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कळंबनंतर आता धाराशिव शहरातही पक्षांतर

काही दिवसांपूर्वी कळंब नगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळे कळंबमधील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली होती. त्यानंतर आता धाराशिव नगरपालिकेतील चार नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्यातील राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

वाशीमध्येही राजकीय समीकरणे बदलली

दुसरीकडे वाशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही युवकांनी आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात एकीकडे ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्के बसत असताना दुसरीकडे शिवसेनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

धाराशिवचा राजकीय पॅटर्न बदलतोय?

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून धाराशिव जिल्ह्याची ओळख होती. मात्र गेल्या काही काळापासून जिल्ह्यात सातत्याने पक्षांतराच्या घटना घडत आहेत. कळंबनंतर धाराशिव शहर आणि आता वाशीमध्येही राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. दरम्यान, धाराशिव नगरपालिकेतील चार नगरसेवकांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होणार, तसेच ठाकरे शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us