आरोग्य विभागातही नैराश्याचं वातावरण, शेकडो मानसेवी डॉक्टरांची मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येसाठी परवानगी!

| Updated on: Jul 06, 2021 | 4:58 PM

स्वप्निल लोणकरसारखे आम्ही पुरते निराश असल्याची भावना आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणार्या मानसेवी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तब्बल 281 डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी या डॉक्टरांनी दिलीय.

आरोग्य विभागातही नैराश्याचं वातावरण, शेकडो मानसेवी डॉक्टरांची मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येसाठी परवानगी!
मानसेवी डॉक्टरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने शनिवारी आत्महत्या केली. त्यानंतर सर्व स्तरातून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील नैराश्याचं वातावरणही आता समोर येत आहे. स्वप्निल लोणकरसारखे आम्ही पुरते निराश असल्याची भावना आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणार्या मानसेवी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तब्बल 281 डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी या डॉक्टरांनी दिलीय. (Doctor’s letter to CM Uddhav Thackeray seeking permission to commit suicide)

जवळपास दोन दशकं हे सर्व बीएएमएस डॉक्टर 16 आदिवासी जिल्ह्यात दुर्गम भागातील गावांमध्ये तसंच जिथं रस्तेही पोहोचत नाहीत अशा पाडे आणि वस्त्यांवर जाऊन रुग्णसेवा करत आहेत. गरोदर माता तसंच कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीपासून किरकोळ आजार, साप- विंचू दंश, वेगवेगळ्या आजारांवर उपचार हे डॉक्टर करतात. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलीस आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र, आम्हा डॉक्टरांना वेठबिगारासारखे 24 हजार रुपये मानधनावर राबावे लागते, अशी व्यथा या 281 डॉक्टरांच्या भरारी पथकातील डॉ शेषराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.

मानधनवाढीचा फक्त निर्णय, अंमलबजावणी अद्याप नाही

करोना संकटाच्या काळात गेल्या दीड वर्षात गावखेड्यातील करोना बाधित रुग्णांसाठी आम्ही काम केलं आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ डॉक्टर त्यांना गरज असेल तिथं आमच्याकडून काम करून घेतात. मात्र, साधी माणुसकीही भरारी पथकाच्या आम्हा डॉक्टरांना दाखवली जात नाही, अशी खंतही सुर्यवंशी यांनी व्यक्त केलीय. 10 महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आदिवासी मंत्र्यांकडील बैठकीत आदिवासी जिल्ह्यात काम करणाऱ्या भरारी पथकाच्या 281 डॉक्टरांचे मानधन 24 हजार रुपयांवरून वाढवून 40 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागात डॉक्टरांची हजारो पदे रिकामी आहेत. दुर्गम आदिवासी जिल्ह्यात काम करण्यासाठी ‘एमबीबीएस’ डॉक्टर फिरकतही नाहीत तरीही दोन दशकांपासून हंगामी पद्धतीने काम करणाऱ्या आम्हा डॉक्टरांना सेवेत कायम करायला सरकार तयार नाही, असंही या भरारी पथकाच्या डॉक्टरांचे म्हणणं आहे.

आत्महत्येला परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र

अनेकवेळा आम्ही आरोग्यमंत्री राजेश टोपे व खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना पत्र लिहून मानधनवाढ व सेवेत कायम करण्याची मागणी केली आहे. मानधनवाढीचा निर्णय सरकारने घेतला त्याला 10 महिने लोटल्यांनंतरही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मे महिन्यात पत्र लिहून किमान आत्महत्या करायला परवानगी द्यावी, अशी मागणी केल्याचे डॉ राजन तडवी यांनी सांगितलं. दुर्गम भागातील रुग्णांचा विचार करून आम्हाला आंदोलनही करता येत नाही आणि सरकार थोडीही सहानभूती दाखवायला तयार नाही. आज आरोग्य विभाग 18 हजार रुपये तर आदिवासी विभाग 6 हजार असे 24 हजार रुपये मानधन आम्हाला मिळते. मात्र तेही वेळेवर मिळेल याची कोणतीही खात्री नसते.

40 हजार मानधनवाढीचा निर्णय 10 महिन्यांपूर्वी घेऊनही सरकार अंमलबजावणी करणार नसेल तर या डॉक्टरांनी करायचे काय? असा सवाल डॉ अरुण कोळी यांनी विचारला आहे. स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्यानंतर आत्महत्या करू नये असे अनेक तज्ज्ञ माध्यमातून सांगत आहेत. गेली पाच वर्षे जगण्याची लढाई आम्ही लढत आहोत. आणखी किती काळ लढू हे कुणी मानसोपचार तज्ज्ञ सांगतील का? अशा शब्दात या डॉक्टरांनी आपली भावना व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :

कर्जाचा डोंगर, वाढत्या अपेक्षा… मला माफ करा; MPSC उत्तीर्ण स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट जशीच्या तशी…

व्हिडीओ पोस्ट करत कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; ‘या’ लोकांना धरलं जबाबदार

Doctor’s letter to CM Uddhav Thackeray seeking permission to commit suicide