पावसाचा रेल्वे सेवेला फटका, तीन दिवस मेगा ब्लॉक घेतला तरी…

बोलेरो पीकअप चालकाने त्या पाण्यातून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तो चांगलाच अंगलट आला. पाण्यात मध्येच गाडी बंद पडली. चालकाची घाबरगुंडी उडाली.

पावसाचा रेल्वे सेवेला फटका, तीन दिवस मेगा ब्लॉक घेतला तरी...
Govinda Hatwar | Updated on: Jul 22, 2023 | 7:53 PM

मुंबई : राज्यात पुराने कहर केला. रायगडमध्ये दरड कोसळली. नद्यांना पूर आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा पंचक्रोशीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. बांदा दानोली मार्गावर ही पाणी असताना एका बोलेरो पीकअप गाडीच्या चालकाचा अतिउत्साह त्याला चांगलाच नडला. रस्त्यात पुराचे पाणी असताना या बोलेरो पीकअप चालकाने त्या पाण्यातून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तो चांगलाच अंगलट आला. पाण्यात मध्येच गाडी बंद पडली. चालकाची घाबरगुंडी उडाली. नशीब बलवत्तर म्हणून जीवावर प्रसंग उद्भवला नाही. मात्र जेसीबी आणून गाडी बाहेर काढावी लागली.

अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका

वाशिमच्या मानोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला. तालुक्यातील बेलोरा गावाला खोराडी नदीचा तर वरोली आणि कारखेडा, तडप गावाला अरुणावती नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोहरादेवी, गव्हा, धानोरा गाडगे, कोंडोली, वाटोड, नायगाव या गावांतही पुराचे पाणी शिरले. या पुरामुळे गावातील घरांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

२२ गावांतील वीज पुरवठ्यावर परिणाम

खेड तालुक्यात १९ व २० जुलै रोजी अतिवृष्टी झाली. महावितरण कंपनीच्या खेड विभागांतर्गत येणाऱ्या २२ गावांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. आंबवली उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणारी मुख्य ३३ के.व्ही. वाहिनी आंबवली येथे जगबुडी नदीपात्रात तुटून पडली. चिपळूण येथे NDRF टीम या कामासाठी तैनात केली. NDRF टीमसह त्यांच्या ४ होड्या, महावितरण कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मार्फत वीजपुरवठा पूर्ववत केला.

 

पावसाचा रेल्वे सेवेला फटका

मनमाड-दौंड लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. बेलापूर ते पढेगावदरम्यान महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने 22 जुलैपर्यंत तीन दिवस मेगा ब्लॉक घेतला. मात्र पावसामुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या दौंड-निजामाबाद डेमू, पुणे-भुसावळ मेमू आणि निजामबाद-दौंड डेमू या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या चार गाड्या नाशिकमार्गे वळवण्यात आल्यात. इतर 6 गाड्यांचेदेखील मार्ग बदलण्यात आले आहेत. तर, नागपूर-पुणे आणि नांदेड-पुणे या रेल्वे पुणतांबा रेल्वे स्थानकावर थांबून आहेत. सहा ते सात तासांपासून प्रवासी खोळंबले आहेत.

हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदी, निम्न साखळी नदी आणि नाल्याला पूर आला. जवळपास पंधरा गावांचा संपर्क तुटला. मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हरणी, हेटी, गोळेगाव, जगतपूर, खंडाळा, जावरा मोळवन, शहापूर, साखरा, वेणी, कणी, टाकळी, कानडा, नानसावंगी या गावांचा संपर्क तुटला. बेंबळा नदीच्या पुराचे पाणी सिद्धनाथपूर आणि धामक या गावात जात आहे. काही नाल्यांच्या पुराचे पाणी गावात जात आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us