गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीचा नाशिककरांनी उचलला विडा; केंद्राकडून 1800 कोटी अन् राज्याकडून 400 कोटी मिळवण्याचे प्रयत्न

| Updated on: Dec 01, 2021 | 8:02 AM

गोदावरीतले प्रदूषण पाहून अनेकजण नाकेही मुरडतात. हेच पाहता केंद्र सरकारकडून 1800 कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून 400 कोटी मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीचा नाशिककरांनी उचलला विडा; केंद्राकडून 1800 कोटी अन् राज्याकडून 400 कोटी मिळवण्याचे प्रयत्न
नाशिकमधील गोदाकाठ.
Follow us on

नाशिकः नाशिकमधली गोदावरी. लाखो भाविकांचे पवित्र तीर्थस्थान. येथेच कुंभमेळा भरतो. देश-विदेशातील भाविक येथे हजेरी लावतात. मात्र, गोदावरीतले प्रदूषण पाहून अनेकजण नाकेही मुरडतात. हेच पाहता केंद्र सरकारकडून 1800 कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून 400 कोटी मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठीचा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे तर दुसरा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाला सादर केला आहे. या दोन्ही पैकी एकही प्रस्ताव मंजूर झाला, तर नक्कीच गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी हातभार लागणार आहे.

नमामि गोदावरी

नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. सतीश कुलकर्णी हे महापौर आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडे नमामि गोदावरी प्रकल्पाच्या नावाखाली 1800 कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनही गोदावरीचे प्रदूषण कमी करणे, गोदाघाट स्वच्छ आणि सुंदर करण्याचा त्यांचा विचार आहे. येता फेब्रुवारी महिन्यात नाशिक महापालिकेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निधी मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजते. हा निधी मिळवण्यात त्यांना यश आले, तर शहरातील गोदावरी नदीचे नक्कीच भाग्य उजळणार आहे.

आयुक्तांच्या प्रस्तावात काय?

गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केलेल्या प्रस्तावात भर देण्यात आला आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहे. त्यावर सुनावणीवेळी गोदापात्रातले सांडपाणी इतरत्र वळवून त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. शिवाय गोदावरी, नंदिनी, वालदेवी नद्यांच्या बाजूने महापालिकेने मलजल वाहिन्या टाकल्या आहेत. मात्र, शहराची लोकसंख्या वाढली. त्यामुळे या वाहिन्यांवरही ताण आला आहे. त्यामुळे सांडपाणी नदीपात्रात मिसळत आहे. पाण्यातील ऑक्सिजन पातळी 10 च्या खाली असावी, यासाठी मलनिस्सारण केंद्राची क्षमता वाढवणे, या केंद्रांचे आधुनिकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी 400 कोटींची मागणी करण्यात आली आहे.

मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण

महापालिका प्रशासनाचा शहरातील मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचा विचार आहे. आगरटाकळी, चेहेडी, पंचक, गंगापूर, तपोवन येथे मलनिस्सारण केंद्र आहेत. त्यांची क्षमता 360 दशलक्ष लिटर्स आहे. त्यात तपोवन, आगरटाकळी, चेहेडी, पंचक केंद्राचे आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेला 400 कोटी रुपयांची गरज आहे.

इतर बातम्याः

Nashik | कंपन्या, शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी पाणी; कसा अन् कुठे कराल अर्ज, घ्या जाणून

साहित्य संमेलनातच लसीकरणाचा मांडव, लस न घेतलेल्यांना जागेवरच डोस; शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर

Nashik | महापालिका निवडणुकीचा कच्चा प्रभागरचना आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवला; 15 डिसेंबरनंतर कार्यक्रम जाहीर होणार