Bacchu Kadu : बच्चू कडू यांना शिंदेंची मोठी ऑफर, आमदारकीसह सहा महिन्यात..पण एकच अट, दुसरी बाजू आली समोर

Bacchu Kadu : महाराष्ट्रातील आक्रमक नेते अशी बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदारकीची ऑफर आहे. काल बच्चू कडू आणि उदय सामंत यांची चर्चा झाली. या बैठकीत काय घडलं? त्याची दुसरीबाजू समोर आली आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांना शिंदेंची मोठी ऑफर, आमदारकीसह सहा महिन्यात..पण एकच अट, दुसरी बाजू आली समोर
Eknath Shinde-Bacchu Kadu
| Updated on: Apr 28, 2026 | 11:39 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या बातम्या सुरु आहेत. लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत. विधान परिषदेसाठी 28 मतांचा कोटा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतात. एकाजागेवर निलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. दुसऱ्या जागेवर कोणाला संधी मिळणार ? हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं. तशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे. यामुळे बच्चू कडू यांचं एकप्रकारे राजकीय पूनर्वसन होणार आहे. सध्या बच्चू कडू आमदार नाहीयत.

बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देताना त्यांच्यासमोर पक्ष विलीनीकरणाची अट ठेवली आहे. बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते विलीन करावा लागेल, तरच बच्चू कडू यांची विधान परिषदेवर वर्णी लागले अशी माहिती आहे. प्रहार हा बच्चू कडू यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. विदर्भात या पक्षाचं चांगलं नेटवर्क आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणण्याची प्रहार पक्षाची क्षमता नाहीय. पण कार्यकर्त्यांचं चांगलं जाळं आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बळ वाढू शकतं.

ऑफरवर प्रहारची भूमिका काय?

काल बच्चू कडू आणि शिंदेंच्या सेनेचे नेते उदय सामंत यांच्यात एक बैठक पार पडली. त्यात काय चर्चा झाली, त्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेवर बच्चू कडू यांना दिलेल्या ऑफरची दुसरी बाजू समोर आली आहे. आमदारकी सोबतच सहा महिन्यात मंत्रीपद देण्याचा बच्चू कडू यांना शब्द देण्यात आला आहे. पण त्यासाठी पक्षाचं शिवसेनेत विलिनीकरण ही मुख्य अट घालण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी या संदर्भात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा केली.

त्यावेळी पदाधिकाऱ्यांचा सूर असा आहे की, मंत्रीपद सहा महिन्यांनी देणार असतील, तर विलिनीकरणाची घाई कशाला करायची?. सहामहिने प्रहार पक्ष तसाच राहू द्या. जेव्हा मंत्रीपद देतील, तेव्हा विलिनीकरण करा. पण बच्चू कडू यांना आमदारकी मिळत असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका आहे.

Follow Us