
लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषद, नगरपंचायत या निवडणुका झाल्यानंतर आता राजकीय वातावरण स्थिर होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी आता शिंदेंनी खासदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. ठाकरे गटातील निम्म्याहून अधिक खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे यातील ४ खासदार पक्षप्रवेशासाठी अतिशय सकारात्मक असल्याचे बोललं जात आहे.
नुकतंच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केली. या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत केवळ राज्यातील विकासकामांवर चर्चा झाली नसून आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी आगामी काळातील राजकीय रणनिती कशाप्रकारे आखल्या जातील, यावर चर्चा करुन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातून संपर्कात असलेल्या खासदारांची संपूर्ण यादीच पक्षश्रेष्ठींना सादर केली आहे. लोकसभा खासदारांच्या या संभाव्य पक्षबदलात कोणतेही कायदेशीर अडथळे येऊ नयेत, यासाठी कायदेशीर तरतुदींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच या पक्षांतरामुळे कोणाचेही सदस्यत्व रद्द होऊ नये, यासाठी योग्य वेळ आणि तांत्रिक बाबी तपासूनच ठाकरेंना हा धक्का दिला जाणार आहे.
1.डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे – कल्याण
2.नरेश गणपत म्हस्के – ठाणे
3.रवींद्र दत्ताराम वायकर – मुंबई उत्तर-पश्चिम
4.श्रीरंग अप्पा चंदू बारणे – मावळ
5.प्रतापराव गणपतराव जाधव – बुलढाणा
6.संदीपनराव आसाराम भुमरे – औरंगाबाद
7.धैर्यशील संभाजीराव माने – हातकणंगले
1.अरविंद सावंत – मुंबई दक्षिण
2.अनिल देसाई – मुंबई दक्षिण मध्य
3.संजय दिना पाटील – मुंबई उत्तर-पूर्व
4.संजय देशमुख – यवतमाळ-वाशीम
5.नागेश बापूराव पाटील आष्टिकर – हिंगोली
6.संजय हरिभाऊ जाधव – परभणी
7.राजाभाऊ प्रकाश वाजे – नाशिक
8.भाऊसाहेब राजाराम वाकचौरे – शिर्डी
9.ओमप्रकाश राजेनिंबाळकर – उस्मानाबाद (धाराशिव)
लोकसभा खासदारांची संख्या वाढवण्यासाठी शिंदे गटाने हे विशेष नियोजन आखले आहे. याच पार्श्वभूमीवर काल दिल्लीत मोठी खलबतं झाली. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेत्यांसोबत या प्रवेशाबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी योग्य मुहूर्त साधून उद्धव सेनेला खिंडार पाडण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे बोललं जात आहे. या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आपल्या खासदारांना रोखण्यासाठी मातोश्रीवरून काय हालचाली होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.