Explainer : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची आमदारकी का नाकारली? 5 मोठी कारणं समोर
शिवसेना ठाकरे गट विधान परिषदेसाठी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांचं नाव देखील चर्चेत होतं.

राज्यात आता सध्या विधान परिषद निवडणुकीचं वारं वाहत आहे, भाजपकडून मंगळवारी विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या 6 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना ठाकरे गट यावेळी कोणाला विधान परिषदेवर संधी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेची निवडणूक लढवणार नाहीयेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अंबादास दानवे हे आता शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.
दरम्यान जर विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे हे लढवणार असतील तर आम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करू अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली होती. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. यावर काँग्रेसने आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. उमेदवार जाहीर करताना शिवसेना ठाकरे गटाने आम्हाला विश्वासातच घेतलं नाही, जर उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तर आम्ही सहकार्य करू अशी आमची भूमिका होती, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत काँग्रेस देखील उमेदवार देण्याची शक्यता आहे.
ठाकरे यांनी विधान परिषद का नाकाराली?
पक्षांतर्गत नाराजी – यामागे पक्षांतर्गत नाराजीचं कारण देखील असल्याची चर्चा आहे. आधीच शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे, अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे, त्यामुळे ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.
पक्षसंघटना बांधणीसाठी वेळ – विधान परिषदेनंतर राज्यात पुढील काही दिवस एकही मोठी निवडणूक नाही, त्यामुळे विधा परिषदेवर जाऊन काही फार फायदा होणार नाही, त्यापेक्षा पक्ष संघटनेसाठी वेळ मिळावा अशी भूमिका यामागे उद्धव ठाकरे यांची असू शकते.
घराणेशाहीचा आरोप – उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात मुख्यमंत्री होते, तसेच याच सरकारच्या काळात आदित्य ठाकरे हे मंत्री होते, त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री झाले, मुलाला मंत्री केलं असे आरोपही त्यावेळी झाडे, हे सर्व आरोप खोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारी नाकारली असावी अशी चर्चा आहे.
मराठवाड्यातील चेहरा – एकेकाळी मराठवाड्यात शिवसेनेचं खूप वर्चस्व होतं. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्याचा मोठा फटका या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पकड मजबूत करण्यासाठी अंबादास दानवे यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. दानवे हे मराठवाड्यातील शिवसेना ठाकरे गटाचा एक प्रमुख चेहरा आहेत.
दानवेंचा अनुभव – दरम्यान उमेदवारीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र अंधारे यांच्यापेक्षा अंबादास दानवे हे अधिक अनुभवी नेते आहेत. त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली असावी, अशी चर्चा आहे.
