Gondia Farmer : डोक्यावर कर्ज, रब्बीतील धान विक्री झालीच नाही, गोंदियातील शेतकऱ्यानं स्वतःला संपविलं

| Updated on: Sep 02, 2022 | 8:28 PM

घटना घडली तेव्हा गिरीधारी भेंडारकर यांचा नातू शेतात खत मारायला गेला होता. नातू विशाल माधो तरोणे खत मारुन घरी परत आला. त्याचे आजोबा घरी गळफास लागलेल्या अवस्थेत दिसले.

Gondia Farmer : डोक्यावर कर्ज, रब्बीतील धान विक्री झालीच नाही, गोंदियातील शेतकऱ्यानं स्वतःला संपविलं
गोंदियातील शेतकऱ्यानं स्वतःला संपविलं
Follow us on

गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी (Sadak Arjuni) तालुक्यातील कनेरी/मनेरी येथील शेतकऱ्यानं आत्महत्या केली. गिरीधारी सखाराम भेंडारकर (Giridhari Bhendarkar) वय ६० वर्ष असं मृतक शेतकऱ्याचं नाव आहे. गिरीधारी यांनी काल दुपारी आपल्या राहत्या घरी कुणीच नसताना गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर होतं. शिवाय रब्बी हंगामातील धान विक्री झाली नव्हती. आर्थिक अडचणीमुळं त्यांनी गळफास लावल्याची माहिती आहे. मृत्यू पश्चात पत्नी चंद्रभागा, एक मुलगा व तीन लग्न झालेल्या मुली आहेत. मुलगा आपल्या पत्नीसोबत पुण्याला कंपनीत (in Pune Company) कामाला आहे. त्यांची पत्नी घराचे बाजूला असलेल्या शेतात निंदन करायला गेली होती.

नातू शेतात, आजोबा घरी

घटना घडली तेव्हा गिरीधारी भेंडारकर यांचा नातू शेतात खत मारायला गेला होता. नातू विशाल माधो तरोणे खत मारुन घरी परत आला. त्याचे आजोबा घरी गळफास लागलेल्या अवस्थेत दिसले. त्याने घराजवळील लोकांना बोलावून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन डुग्गीपारचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

पत्नीवर एकटी राहण्याची वेळ

यंदा धानाची खरेदी करण्यासाठी केंद्रानं तारीख वाढवून दिली. पण, तरीही काही शेतकरी यापासून वंचित राहिले. गिरीधारी यांच्यावर कर्जाचे डोंगर होते. धान वेळेवर विकले नव्हते. तीन मुलींची व मुलाचं लग्न झालं. त्यात बराच पैसा खर्च झाला. मुलगा पुण्यात कंपनीत काम करतो. मुली आपआपल्या घरी गेल्यात. अशात गिरीधारी यांच्यासोबत पत्नी राहत होती. शिवाय मुलीचा मुलगा त्यांच्याकडे राहत होता. अशावेळी त्यांनी हा घातक निर्णय़ घेतला. त्यामुळं आता चार मुलं असूनही पत्नीला एकटं राहण्याची वेळ आली आहे. सोबत नातू आहे. पण, तो आता किती दिवस राहील काही सांगता येत नाही.

हे सुद्धा वाचा