सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक

| Updated on: Oct 19, 2021 | 4:12 PM

राज्य सरकारनं निरीक्षक म्हणून नेमणूक केलेले हे 8 अधिकारी संपूर्ण परीक्षा काळात नियंत्रण करणार आहेत. कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास ती सोडवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी या निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक
राजेश टोपे, आरोग्य मंत्री.
Follow us on

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील सावळ्या गोंधळामुळे राज्यभरातील परीक्षार्थींना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे परीक्षार्थी, पालकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली. तर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही आरोग्य विभागाच्या या कारभारावर जोरदार टीका केली. सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारला जाग आली आहे. परीक्षेतील गोंधळ टाळण्यासाठी राज्य सरकारनं आरोग्य विभागातील उपसंचालक दर्जाच्या 8 अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. (Health Department Exams Appointment of 8 Deputy Commissioner level inspectors for examinations)

राज्य सरकारनं निरीक्षक म्हणून नेमणूक केलेले हे 8 अधिकारी संपूर्ण परीक्षा काळात नियंत्रण करणार आहेत. कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास ती सोडवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी या निरीक्षकांची नेमणूक केली आहे. दरम्यान, 24 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड विभागाची परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

बच्चू कडू यांचा घरचा आहेर

शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. बच्चू कडू यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं किमान हे एक तरी पारदर्शक काम करावं अशा शब्दात बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.

रोहित पवारांचा सरकारला सल्ला

तर रोहित पवार यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला सल्ला दिलाय. एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

‘येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घ्या’

उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएसी मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंतीही रोहित पवार यांनी केलीय.

इतर बातम्या : 

मुंबई महापालिकेवर भाजपचा इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला सवाल

मुंबई महापालिका कर्मचारी, पोलिसांविरोधात किरीट सोमय्यांची तक्रार, अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी

Health Department Exams Appointment of 8 Deputy Commissioner level inspectors for examinations