उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार नागेश पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, अतिरेक झाला..
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केली. शिवसेना ठाकरे गटातून त्यांनी फारकत घेतली. यादरम्यान दोन ते तीन दिवसांनंतर ते पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या पुढे आले. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बंडखोर खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे तिघेही मतदार संघात जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यादरम्यानच आता बंडखोरीनंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले की, मी आज दोन तीन दिवसांनंतर आपल्यासमोर पहिली पोस्ट शेअर करत आहे. बऱ्याचदिवसापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे. मी पहिल्यांदा तर सांगतो की, मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये. उद्धव ठाकरे यांच्यावर तर अजिबात नाराज नाहीये. त्यांनी मला खूप प्रेम दिले, याबाबत दुमत नाहीये. संजय राऊत वगैरे कोणी ही मोठी मंडळी बोलत असेल तर तो त्यांचा हक्क आहे, त्यांनीही माझ्यावर प्रेम केले आहे, ते बोलतील, ते काही अडचणीचे नाही.
माझ्या वडिलांप्रमाणे ते आहेत, ते बोलले तरीही मला त्याच्यावर वाईट वाटणार नाही. पण हे सर्व करत असताना आम्ही 18 तारखेपर्यंत तरी कोणी कुठेच गेलो नव्हतो. पण ज्यापद्धतीचा अविश्वास किंवा बोलण्याचा अतिरेक झाला, त्यानतंर बऱ्याच मंडळींनी विचार केला की, आता तिथे थांबून फार उपयोग होणार नाही. खरं सांगायचे झाले तर आपल्या सर्वांना माहिती आहे की, खूप दिवसांपासून आपण पाहतोय की, सत्तेशिवाय कुठलीही कामे होत नाहीत. त्यामुळे कदाचित मी या सर्व गोष्टींचे पाऊस उचलले, त्यामागील हे मोठे कारण असू शकते.
माझ्या मतदार संघात विकासकामे करावी लागतील. लोकांनी मला खूप मोठ्या आशेने निवडून दिले आहे. मला त्यांची कामे करणे कर्मप्राप्त आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, कोणत्याही प्रकारचा निधी आपल्याला मिळत नाही. जे 5 कोटी मिळतात, ते अतिशय अपुरे आहेत. प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आहेत. प्रत्येकाने मला काही ना काही आशेने निवडून दिले. मी ही कामे कशी करायची आणि निधी कुठून मिळवायचा ? लोकांची जी कोणती कामे आहेत, ती होत नव्हती. सर्वांना माहिती आहे की, सत्तेशिवाय करता येत नव्हते.
त्यामुळे हे पाऊल उचलले असेल, बऱ्याच जणांना पटले असेल नसेल. जनता जनार्धन आहे, प्रत्येका तालुक्याने माझ्यावर खूप जास्त प्रेम केले. खूप मोठ्या आशेने निवडून दिले आहे. मी दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे. पुढेही करत राहिल,मी आपल्याचसोबत आहे. पण मला काम करायचे असेल निधी जर आणायचा असेल तर सत्तेत जाण कर्मप्राप्त आहे. बंडखोरीनंतर पहिल्यांदाच आपल्या मनातील भावना व्यक्त करताना नागेश पाटील आष्टीकर दिसले.