IMD Monsoon : एल निनोचा मान्सूनवर कब्जा, राज्यात या भागात सर्वात कमी पाऊस; नव्या अंदाजाने समोर मोठं संकट!
सध्या मान्सून राज्यभरात पोहोचत आहे. मुंबई, कोकण परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. वातावरणात गारवा जाणवत आहे. मान्सून सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग व्यापून टाकतो आहे. मान्सून हा दाक्षिण कोकण आणि सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात अगोदरच दाखल झाला आहे.

Monsoon Update : सध्या महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. यंदाचा मान्सून दर वर्षाच्या तुलनेत उशिराने आला आहे. या वर्षी एल निनोचेही संकट असणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठ पेरणीसाठी चांगल्या पावसाची वाट पाहावी, असे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, आता याच एल निनोचा सर्वात जास्त धोका नेमका कोणाला बसणार? याबाबतचा हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीचे काम हाती घ्यावे, असे सांगितले जात आहे.
मराठवाड्याला सर्वात जास्त फटका
यावर्षी महाराष्ट्रात एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान कमी असणार असल्याचे संकेत भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. याचा सगळ्यात जास्त फटका हा मराड्यालातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. एल निनोमुळे मराठवाड्यात पाऊस कमी असणार असून उन्हाची तीव्रता जास्त असणार आहे. तशी शक्यता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, यासह कमी कालावधीत येणारी पिके शेकाऱ्यांनी घ्यावीत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
मान्सूनची व्याप्ती वाढणार
सध्या मान्सून राज्यभरात पोहोचत आहे. मुंबई, कोकण परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. वातावरणात गारवा जाणवत आहे. मान्सून सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग व्यापून टाकतो आहे. मान्सून हा दाक्षिण कोकण आणि सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात अगोदरच दाखल झाला आहे. आणखी दोन दिवसात त्याची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळेच सध्या पाऊसमान कमी असल्याने कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत, असे आवाहन केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेदेखील 15 जूनपर्यंत मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे सांगितले आहे.