
इतके दिवस हवीहवीशी , सुखकर वाटणारी थंडी हळूहळू राज्यातून गायब होत चालली आहे. महाराष्ट्रात आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. सकाळी जरी थोडाफार गारवा असला तरी दिवस जसजसा वर यायला लागतो तसतसा उकाडा वाढण्यास सुरूवात होताना दिसत आहे. राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा काहीसा वाढला होता. मात्र थंडी पुन्हा कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आजपासून म्हणजेच 11 तारखेपासून राज्याच्या किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यासोबत कमाल तापमानातही वाढ होत असल्याने उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता घामाच्या धारा वाहण्यास सुरूवात होणार आहे.
असं असलं तरीही केंद्रीय हवामानशास्त्र विभाग, आयएमडीकडून मध्य भारतासह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशाराही जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये केरळासह महाराष्ट्राचा काही भाहग, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणामध्ये पावसाची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
उकाडा वाढतोय घ्या काळजी
राज्यात मुंबईसह परिसरातील थंडी जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली आहे. येत्या काळात वातावरणात तीव्र बदल दिसेल. सकाळी जाणवणारा गारवा आता लुप्त होत जाईल आणि दुपारी चांगलाच उकाडा जाणवेल. हवामान कोरडं आणि निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील काही दिवसांतही उष्णतेची तीव्रता अशीच राहू शकते.
तापमानातील चढउतार नवे नसले तरी अचानक होणाऱ्या बदलांमुळे शरीराला त्रास होऊ शकतो. तापमान वाढ सुरू झाली असून कमाल तापमान सातत्याने वर चढताना दिसेल. हळहूळ उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून उष्माही चांगलाच जाणवायला लागला आहे. त्यामुळे हवामानातील या बदलांचा आरोग्यावर होणारा परिणाम पाहता, नागरिकांनी जपून रहाव, प्रकृती, आरोग्य जपावे असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे.